ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन
मुंबई, दि. 4 – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
बासू चॅटर्जी यांचा अल्पपरिचय- जन्म. १० जानेवारी १९३०, सहायक दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू करणा-या बासू चटर्जी यांनी दिग्दर्शक म्हणून रजनीगंधा, चितचोर, छोटीसी बात, खट्टामीठा, बातों-बातों में सारखे सुंदर चित्रपट दिले. स्वच्छ मनोरंजक चित्रपटात विविधता देणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटाची गती वाढवली. त्यांचे त्याच वेळी एकाच वर्षात दोन चित्रपट येणे सुरू झाले. बासूदा हे आपल्या चित्रपटांतून मध्यमवर्गाची छोटीसी बात सांगत.पन्नासहून अधिक हिंदी व बंगाली चित्रपटांसह त्यांनी रजनी, व्योमकेश बक्षी या मालिकांचे दिग्दर्शन केले. हृषिकेश मुखर्जी आणि बासु चॅटर्जी यांची त्या काळी असलेल्या निकोप स्पर्धेमुळे खरोखर मनाला विरंगुळा देणारे चित्रपट निर्माण झाले. बी. आर. चोप्रा यांनी ‘छोटीसी बात’च्या वेळी बासू चटर्जींना तसेच स्वातंत्र्य दिल्याने निखळ मनोरंजन करणार्या मध्यमवर्गीय चित्रपटाचा प्रवाह सुरू झाला. राजेंद्र यादव यांच्या सारा आकाश कादंबरीवर बासु चटर्जी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा मृणाल सेन यांच्या भुवनशोमच्या बरोबरीने समांतर धारेतला पहिला चित्रपट ठरला.बासु चॅटर्जी यांची कन्या रूपाली गुहा यांनी आपल्या वडीलांची परंपरा पुढे सुरू ठेवत मराठी सिनेनिर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांचे पती कल्याण गुहा हे हिंदीतील निर्माते दुलार गुहा यांचे पुत्र असून गुहा दाम्पत्याच्या निर्मितीखाली `नारबाची वाडी’ हा त्यांचा पहिला वहिला मराठी सिनेमा तयार झाला होता. त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील निर्मात्यांची सेकंड जनरेशन मराठी सिनेमाकडे वळली आहे असं म्हणता येईल.