fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRA

करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ५० लाखांचं विमा कवच

मुंबई, दि. ४ – सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करोनाविरोधात दिवसरात्र लढा देत आहेत. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रांचादेखील अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. करोना काळात माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही अपार मेहनत करत आहेत. तर दुसरीकडे आपलं कर्तव्य बजावताना काही पत्रकारांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, करोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना ५० लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

“केवळ डॉक्टर आणि पोलीसचं नाही तर पत्रकारही करोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवानं जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही बरे व्हालचं. दुर्देवानं कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचं विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही,” असं टोपे म्हणाले.

“जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. तसंच करोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचं हे विमा कवच मिळणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शिवसेना नेत्या डॉ. मनिषा कायंदे यांनीदेखील पत्रकारांना विमा संरक्षण जाहीर केल्याबद्दल राजेश टोपे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading