‘खोट्या आकडेवारीचा’ बुडबुडा फुटला..! – गोपाळदादा तिवारी, काॅंग्रेस प्रवक्ते
केंद्र सरकारनेच थकवले महाराष्ट्राचे तब्बल ४२ हजार कोटी रूपये..!!
पुणे, दि. २७ – केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत केली आहे(?) असे सांगून महाराष्ट्राला दोन लाख कोटी रूपयांपेक्षा अधिकची रक्कम मदत म्हणून मिळू शकते असा ‘आभासी दावा’ करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खोट्या आकडेवारीचा बुडबुडा आज राज्यातील तीन मंत्र्यांनी ‘पत्रकार परिषद’ घेऊन फोडला आहे..! त्यामुळे “राजरोस खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभुल करण्याचा भाजपचा प्रयत्न” साफ फसला असून, यापुढे भाजपने असले धाडस करण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे.
या संबंधात त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काल फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘अव्वाच्या सव्वा आकडेवारी’ सादर करून, जनतेला भ्रमीत करण्याचा प्रयत्न केला होता. हा सगळा बेबनाव होता. पण तो फार काळ टिकणारा नव्हता. त्याची पोलखोल राज्य सरकारच्या तीन मंत्र्यांनी आज सविस्तरपणे केली आहे. केंद्राने महाराष्ट्राला मदत करण्याऐवजी महाराष्ट्राच्याच वाट्याचे ४२ हजार कोटी रूपये थकवले आहेत, ही बाबही त्यांनी जनतेच्या नजरेला प्रकर्षाने आणून दिली आहे. महाराष्ट्राला १७५० कोटी रूपयांचे गहु दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते पण तेही खोटेच निघाले आहे. राज्याला ‘१लाख ६५ हजार कोटी रूपयांचे कर्ज’ घेण्याची स्पेस केंद्र सरकारमुळे निर्माण झाल्याच्या दाव्याची पोलखोल कालच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या कथित १ लाख ६५ हजार कोटी रूपयांपैकी केवळ दोन टक्केच निधी राज्याला कर्ज म्हणून घेता येणार आहे, बाकीची रक्कम ही सशर्त आहे. त्यासाठीही “बऱ्याच अटी” आहेत ज्या करोनाच्या काळात पुर्ण होणार नाहीत आणि राज्याला ही कर्जाची जादाची स्पेस मिळणार नाही ही बाब फडणवीस यांच्या सारख्यांनी लक्षात घ्यायला हवी होती असेहीं त्यांनी म्हटले आहे. रेल्वेचे ८५ टक्के पैसे केंद्र सरकार देणार असल्याचे भाजपने सांगितले असले तरी मजुरांच्या रेल्वेचा साराच खर्च राज्य सरकारने केला आहे यामुळे यातीलही फोलपणा उघडा पडला आहे. भाजपच्या प्रत्येक खोटारडेपणाची यापुढील काळात अशीच तपशीलवार आकडेवारी देऊन पोलखोल केली जाणार असून, भाजपने आता असल्या भानगडीत न पडता “राज्याला करोनाच्या काळात सहकार्य देण्याची विधायक भूमिका” पार पाडावी असे आवाहनही गोपाळ तिवारी यांनी केले..!