Sunday, June 21, 2026
MAHARASHTRAPUNE

लॉकडाऊन काळातील वीज बिल स्थिर आकार रद्द करावा -सूर्यकांत पाठक यांची मागणी

पुणे : वीज ग्राहकाने वीज जोडणी घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या वीज बिलात त्याच्या जोडभारानुसार आयोगाने मंजूर केलेल्या दराने किमान काही रक्कम स्थिर आकार म्हणून आकारली जाते. मात्र, करोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने देशभरातील उद्योग गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. हा बंद शासन आदेशाने करावा लागत असल्याने या कालावधीत स्थिर आकार लावण्यात येऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केली आहे. 
गुजरात व कर्नाटक शासनाने त्यांच्या राज्यातील व्यापारी व औद्योगिक वीज ग्राहकांच्या लॉकडाऊन कालावधीतील स्थिर आकार रद््द (माफ) केला आहे. असा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने करावा, अशी मागणी गेल्या महिनाभरापासून सर्व औद्योगिक संघटनांनी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वारंवार राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उर्जामंत्री, सर्व पालकमंत्री यांना अनेक वेळा ई-मेल, ट्विटर यावर निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 
सूर्यकांत पाठक म्हणाले, एखाद्या महिन्यात वीज ग्राहकांचा वीज वापर शून्य असेल, तरीही हा स्थिर आकार भरणे अनिवार्य असते. वीज कंपनीने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा व विशिष्ट जोडभार त्या ग्राहकासाठी आरक्षित होत असल्याने ही आकारणी योग्य आहे. व्यापार व औद्योगिक वीज ग्राहकाचा जोडभार खूप मोठा असल्याने त्यांच्या बीलातील स्थिर आकाराच्या रकमा देखील मोठया असतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हा आकार माफ करणे गरजेचे आहे. 
ते पुढे म्हणाले, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचा स्थिर आकार स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. पण स्थगित केलेला आकार तीन महिन्यांनंतर भरावा लागेल. हा भुर्दंड उद्योग क्षेत्रास पेलणे शक्य नसल्याने हा आकार रद््द करावा. तसेच व्यापारी आस्थापने बंद असल्याने वीज वापरही बंद आहेत, त्यामुळे अव्हरेज रिडिंगही त्या महिन्यांसाठी घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading