भारतीय विद्यापीठ संघाची (AIU) ऐतिहासिक १०० वी वार्षिक सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद दि २८ ते ३० एप्रिल
पुणे : भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ (Association of Indian Universities -AIU) ऐतिहासिक १०० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद यंदा पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
२८ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. AIU चे हे शताब्दी वर्ष असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेचे यजमानपद डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी भूषविणार आहे.
या शताब्दी महोत्सवी परिषदेचा मुख्य विषय “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” असा आहे. या परिषदेत देशातील कुलगुरू, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज, धोरणकर्ते आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी भारताच्या उच्च शिक्षणाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण, शाश्वतता आणि सामाजिक उत्तरदायित्व, उद्योजकता आणि स्टार्टअप्स, एआय (AI) आणि क्वांटम तंत्रज्ञान सक्षम संस्था, आरोग्य सेवा आणि अभ्यासक्रम व संशोधनात पारंपारिक ज्ञानाचा समावेश यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली जाईल. हे सर्व विषय शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन संस्कृती आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कार्यक्रमात ‘एआययू’ स्थापना दिनानिमित्त विशेष व्याख्यान, शिखर संस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी संवाद तसेच ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, २०२५’ बाबत चर्चा होणार आहे.
ही परिषद उच्च शिक्षण क्षेत्र मोठ्या बदलांतून जात असताना, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला या महत्त्वाच्या राष्ट्रीय व्यासपीठाचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब आहे. तसेच उच्च शिक्षणातील नवकल्पना, संशोधन, परस्पर सहकार्य आणि भविष्यातील धोरणनिर्मिती यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार असून, भारताच्या शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रगत बनविण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल.
