Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

देशात संसर्गजन्य आजार कमी होत, जीवनशैलीशी निगडित आजार वाढले –  पद्मश्री डॉ. रवी कन्नन आर



पुणे  : एकीकडे भारत विकसित देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना दुसरीकडे देशामध्ये संसर्गजन्य आजार निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाले असून जीवनशैलीशी निगडित आजार वाढत चालले असल्याचे निरीक्षण आसाममधील कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवून आणणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ, पद्मश्री डॉ. रवी कन्नन आर यांनी नोंदविले. नागरिकांच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चालले आहे, त्यामुळे आजारापासून दूर राहायचे असेल तर प्रत्येकाने निरोगी व सुदृढ आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. कन्नन म्हणाले.

पुण्यातील पी. एम. शाह फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित १४ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॉ. कन्नन आर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सदर महोत्सवाचे उद्घाटन समारंभ संपन्न झाले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक जसबीर सिंग, पी. एम. शहा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण कोठाडिया, विलास राठोड, फाउंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी, शरद मुनोत, किरण शहा, डॉ. विक्रम काळुसकर, सतीश कोंढाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरोग्य चित्रपट निवडण्यासाठी परीक्षक म्हणून कमी केलेल्या अनुजा देवधर, नीता मेहता, डॉ. लीना बोरुडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘व्हेनम वॉरियर’ या लघुपटाने आरोग्य महोत्सवाची सुरुवात झाली.

गेल्या काही वर्षांत भारतीयांच्या क्रयशक्तीत वाढ झाल्याने त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल होत असून पर्यायाने कर्करोग, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांमध्येही लक्षणीय वाढ दिसते आहे. आपल्याला भविष्यकाळात देश आरोग्यदृष्ट्या सुदृढ ठेवायचा असेल तर आपण आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याकडेही डॉ. कन्नन यांनी लक्ष वेधले.

डॉ. कन्नन पुढे म्हणाले, “आपली जीवनशैली उत्तम कशी राहील, याकडे लक्ष देण्याचे काम करताना युवा पिढीने त्याबाबत समाजात सजगता निर्माण करण्याचे काम केले तर देशासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या अनेक आजारांचे मूळ कारण हे तंबाखु, मद्यपान करणे, व्यायामाचा अभाव हे असल्यामुळे नागरीकांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.” उत्तम आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम चित्रपटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे घडू शकते. त्यामुळे पुण्यात होत असलेला आरोग्य चित्रपट महोत्सव मी काम करत असलेल्या आसाममधील सिलचर या गावीही आयोजित करण्याची इच्छा डॉ. कन्नन यांनी व्यक्त केली.

यावर्षी संपन्न होत असलेल्या १४ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी देशविदेशातून तब्बल १४५ पेक्षा जास्त लघुपट व माहितीपटांनी आपला सहभाग नोंदविला असून यापैकी निवडक ३१ लघुपट व माहितीपट पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. यामध्ये मानसिक आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य व बाललैंगिक शोषण, महिला आरोग्याचे प्रश्न, अवयवदान, कर्करोग, सामाजिक आरोग्य, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या आदी विषयांचा समावेश आहे. भारतासोबतच जगभरातून दुबई, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, पाकिस्तान, अल्जेरिया, इंग्लंड, बांग्लादेश, सेनेगल, फिलिपिन्स, फ्रान्स, ओमान, सौदी अरेबिया, मेक्सिको, साउथ आफ्रिका, सेरेबिया आणि इराण या देशांतून महोत्सवासाठी प्रवेशिका आल्या आहेत, हे विशेष. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोनिका जोशी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading