Wednesday, May 20, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दिग्दर्शन हे माझे स्वप्न आणि अभिनय हा माझा ध्यास; अभिनेते प्रसाद ओक यांची भावना

अभिनेते सुमीत राघवन यांच्या हस्ते प्रसाद ओक यांना या वर्षीचा निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रदान   

पुणे  : “दिग्दर्शक होणे हे माझे स्वप्न आणि अभिनय हा माझा ध्यास आहे. त्या त्या भूमिकेतला तो तो क्षण जगता आला पाहिजे, असे मला वाटते”, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रसाद ओक यांनी व्यक्त केली. निळुभाऊंना मी देवाच्या जागीच मानतो. त्यांच्या नावाचा पुरस्कार, ही एकाच वेळी आनंदाची, कृतज्ञतेची आणि ऊर्जा देणारी गोष्ट आहे, असेही ओक म्हणाले.

निळू फुले कुटुंबीय आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांना पुरस्काराचे मागील वर्षीचे सन्मानार्थी अभिनेते सुमीत राघवन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान सोहळ्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. रोख रुपये २१ हजार, मानपत्र, गांधी टोपी आणि उपरणे असे या सन्मानाचे स्वरूप होते. ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास लाभली होती. बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले थत्ते आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. पुरस्कार वितरणानंतर निवेदक राजेश दामले यांनी प्रसाद ओक यांच्याशी संवाद साधला.

पुरस्कारा नंतर मनोगत मांडताना प्रसाद ओक म्हणाले, “१९९४ – ९५ च्या सुमारास मी नवीन असताना, ‘प्रेमाची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने मला निळूभाऊ आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासारख्या मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. कलाकार म्हणून ज्यांच्या कामाचा पगडा माझ्यावर आहे, त्यामध्ये निळूभाऊंसह विक्रम गोखले आणि अशोक सराफ यांचा समावेश आहे.” निळू भाऊंच्या जीवनावरील चित्रपट लिहून पूर्ण झाला आहे. लवकरच तो रसिकांसमोर येईल”, अशी माहिती ओक यांनी दिली.

रसिकांशी संवाद साधताना प्रसाद ओक यांनी पुण्यातले बालपण, मुंबईतले सुरवातीचे संघर्षाचे दिवस या आठवणींना उजाळा दिला. “मला साच्यात अडकायला आवडत नाही. आपल्या कामात वैविध्य असावे, असा माझा प्रयत्न असतो. कामाचे समाधान, विशिष्ट व्यक्तीसाठीचे काम किंवा आर्थिक मोबदला, या तीन निकषांवर मी कामाची निवड करतो. पूर्वी मला चित्रपटसृष्टीत कंपूशाही आहे, असे वाटायचे, पण नंतर हे मत बदलले. ज्याचा त्याचा ‘कंफर्ट झोन’ असू शकतो, हे मला पटले”, असेही ओक म्हणाले.

“मी अभिनय आणि दिग्दर्शन करतो, त्या क्षेत्रातले मला कळते आणि तेवढ्यापुरतीच भूमिका मी घेतो”, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘कोणता चित्रपट चालेल आणि कोणता पडेल, हे कुणीच कधी सांगू शकत नाही. त्यामुळे चित्रपट चालला म्हणजे तो चांगला आणि पडला म्हणजे तो वाईट, असे कधीच नसते. कुठल्याही परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करत राहणे, एवढेच आपल्या हातात असते आणि तेवढेच आपण करत राहावे. आगामी काळात भद्रकाली (सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा जीवनपट) तसेच पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट, असे चित्रपट प्रकल्प करत आहे’, अशी माहिती प्रसाद ओक यांनी दिली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी एक चित्रपटगीतही सादर केले.

कार्यक्रमावेळी बोलताना सुमीत राघवन म्हणाले, “अत्यंत हरहुन्नरी, गुणी कलाकाराला हा सन्मान मिळत असल्याचा आनंद आहे. कुठल्याही भूमिकेसाठी नव्हे तर भूमिका घ्यावी, यासाठी हा पुरस्कार आहे. मूल्ये, निष्ठा रसातळाला जात असतानाच्या काळात, जेव्हा आदर्शच उरलेले नाहीत, अशा वेळी निळू भाऊंसारख्या कलाकाराच्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाचा पुरस्कार, आदर्शवत आहे”.

दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, “कलाकारांनी केवळ रोल न करता, स्टॅंड घ्यावा, हे अभिप्रेत आहे. निळू भाऊंनी खलनायकाच्या भूमिका केल्या, पण प्रत्यक्ष जीवनात ते अत्यंत पुरोगामी भूमिका घेणारे, सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यासाठी हजारो प्रयोग करणारे, सामाजिक चळवळीतील हाडाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे समाजातील घटनांविषयी भाष्य किंवा भूमिका घेणे महत्त्वाचे असते, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या काळात ते सेन्सारविरोधात लढले.”

माध्यमांमध्ये चुंबकीय आकर्षण असते, सामर्थ्य असते, तरीही कलाकारांनी पुन्हा पुन्हा रंगभूमीवर आले पाहिजे, रंगभूमीविषयीची कृतज्ञता विसरता कामा नये, हाही आदर्श निळूभाऊंनीच स्वतःच्या उदाहरणातून घालून दिला आहे. प्रसाद ओक हा अतिशय उत्तम आकलन असलेला, स्वच्छ वाणीचा, भूमिकेची समज असलेला. प्रेक्षकांची नेमकी जाण असलेला, विनोदबुद्धी असणारा, मिष्किल आणि चाणाक्ष अभिनेता आहे’, अशा शब्दांत चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रसाद ओक यांचे कौतुक केले.

प्रास्ताविक करताना बेलवलकर सांस्कृतिक मंचचे समीर बेलवलकर म्हणाले, “मनोरंजनापलीकडे प्रबोधनपर वैचारिक असे उपक्रम असावेत, या हेतूने बेलवलकर सांस्कृतिक मंच कार्यरत आहे. निळू भाऊंच्या कार्याला एका सांस्कृतिक कार्यकर्त्याने केलेले हे अभिवादन आहे’,.

चित्रपट कितीही केले, तरी बाबांनी (निळूभाऊंनी) नाटक कधीच सोडले नाही. ते सदैव रंगभूमीवर कार्यरत राहिले. सचिन खेडेकर, सुमित राघवन, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी हे सारेच कलाकार अनेक माध्यमांमध्ये वावरत असूनही रंगभूमीशी नाते जोडून आहेत, हे महत्त्वाचे वाटते, अशा भावना गार्गी फुले थत्ते यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading