Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

हिंदूविरोधी वाङ्मयाला प्रतिवाद करण्याबाबत निराशा – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे

पुणे : सनातन धर्माच्या किंवा भारतीय संस्कृतीच्या विरोधात ज्या संस्था निर्माण झाल्या त्यांनी वाङमय निर्मिती या सगळ्यात मोठ्या शस्त्राचा वापर केला. घराघरात, विद्यार्थ्यांपर्यंत ते वाङमय पोहोचवले. हिंदू धर्माबद्दल कितीही चांगले सांगितले, तरी त्यांच्या मनात श्रद्धा निर्माण होऊ नयेत अशी मानसिकता करण्यात आली. हिंदूविरोधी पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या गोष्टींना, वाङमयाला प्रतिवाद करण्याबाबत निराशा पहायला मिळते, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

डॉ. आनंद बर्वे लिखित ‘श्रीविष्णूंचे अंशावतार’ पुस्तक प्रकाशन सोहळा एरंडवण्यातील सेवा भवन येथे पार पडला. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.एस.पी. मेडिकल फाउंडेशनच्या संचालिका अनुराधा पाटणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे तसेच लेखक डॉ. आनंद बर्वे उपस्थित होते.

चारुदत्त आफळे म्हणाले, अनेक गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती अचूक आहेत हे स्पष्टपणे सांगितल्यास नवीन पिढी त्यांना सहज स्वीकारते. त्यामुळे, त्यांना सामाजिक, शास्त्रीय आणि वैज्ञानिक आयाम कोणता आहे हे स्पष्ट केल्यास, त्यांच्यात भगवंताच्या या सर्व अवतारांबद्दल निश्चितपणे आदर आणि कुतूहल निर्माण होईल, तसेच त्यानुसार कार्य करण्याची प्रेरणाही मिळेल. हिंदु धार्मिक कथांमधील चमत्कारांमागचे अध्यात्मिक रुपक उलगडून सांगितल्यास त्याविषयी रुचि वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

अनुराधा पाटणकर म्हणाल्या, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण तरुणाई करते, असे म्हटले जाते. परंतु आपल्या संस्कृतीची माहिती सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने सांगितल्यास देशातील तरुणांना सनातन धर्माची आवड निर्माण होईल.

डॉ. आनंद बर्वे म्हणाले, मानवी विकासाच्या इतिहासातले जे महत्वाचे टप्पे आहेत त्यात अंशावतार यांचे खूप मोठे काम आहे. श्री विष्णूंचे पृथु, यज्ञ, धन्वंतरी, मोहिनी अंशावतार विविध कथांमधून वर्णन केले गेले आहेत. या अवतारांची फारशी माहिती अनेकांना नसते, ही माहिती व्हावी, यासाठी श्री विष्णूंचे अंशावतार पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. राजेंद्र बलकवडे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading