अजित पवारांनी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागावा – जितेंद्र आव्हाड
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीट परीक्षार्थींची भेट घेण्याच्या भानगडीत न पडता केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागावा किंवा स्वतः राजीनामा द्यावा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवार यांना आव्हान दिले आहे.
नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपण पुणे आणि मुंबईतील नीट परीक्षार्थींची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली. मागील 70 -75 वर्षात झाला नसेल एवढा शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ सध्याच्या काळात झाला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
एमबीबीएससारख्या अभ्यासक्रमासाठी गुणवत्ता तपासणार नसाल, केवळ वशिल्याने डॉक्टर बनवणार असाल तर तुम्ही जनतेच्या जीवाशी खेळत आहात याची जाणीव ठेवा. अशिक्षित माणसाला पाच दहा कोटी रुपये घेऊन तुम्ही डॉक्टर बनवणार. तोच पुढे शल्य विशारद, स्त्रीरोगतज्ञ, बालरोग तज्ञ होणार. पोटाच्या ऐवजी छातीची शस्त्रक्रिया करणार, अशा शब्दात आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. त्यांच्या वर्षाला काही किंमत आहे की नाही? त्यांच्या कष्टाला काही किंमत आहे की नाही? नीटसारखी महत्त्वाची परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी खाजगी संस्थेकडे सोपविली जाते. हा काय तुमच्या घरातला विषय आहे का, असा सवाल आव्हाड यांनी केला. या प्रकाराबद्दल सरकारने प्रायश्चित्त घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.
नीट परीक्षार्थींची भेट कसली घेता? केंद्रात तुमचे सरकार आहे. तुमच्या मित्र पक्षाचा मंत्री आहे. नीट घोटाळ्याला जबाबदार असलेल्या मंत्र्याचा राजीनामा मागा. ते करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या, अशा शब्दात आव्हाड यांनी अजित पवार यांनाही सुनावले.
