भाजपबद्दल मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका अजित पवार यांना सहन करावा लागला
मुंबई: अजित पवार यांना महायुतीत सामावून घेतल्याने भारतीय जनता पक्षाला फटका बसलेला नाही तर भाजपबद्दल मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका अजित पवार यांना सहन करावा लागला आहे, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे.
चारशे पारचा नारा आणि बेताल वक्तव्य नडली
भाजपने दिलेल्या चारशे पारच्या नाऱ्यामुळे संविधान बदलाच्या कथिताला मोठ्या प्रमाणावर हवा मिळत आहे. मतदारांपर्यंत चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे मतदानावर परिणाम होऊ शकतो याची जाणीव आम्ही भाजपला वारंवार करून दिली. याशिवाय निवडणुकीच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेकदा बेताल वक्तव्य केली. त्यामुळे मतदारांमध्ये भाजप बद्दल नाराजी होती. त्याचा फटका आमच्या पक्षालाही बसला, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
भाजप आणि शिवसेना शिंदे गट बहुमतात असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय आवश्यकता होती, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील एका लेखात करण्यात आला होता. त्यावरून महायुतीत धुसफुस सुरू झाली आहे. या वक्तव्यावरच रूपाली पाटील यांनी पलटवार केला आहे.
मी अजित पवार यांच्या सोबतच
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्याला त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, आपण अजित पवार यांच्या सोबतच आहोत, असे रूपाली पाटील यांनी स्पष्ट केले. याबाबत खुद्द अजितदादांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
