मराठा समाजात भारतीय जनता पक्षाबद्दल असंतोष – चंद्रकांत पाटील
मुंबई: मराठा समाजासाठी आम्ही केलेली कामे या समाजातील तळागाळाच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास आम्ही कमी पडलो. त्यामुळे मराठा समाजात भारतीय जनता पक्षाबद्दल असंतोष आहे. त्याचे मतदानात उमटलेले पडसाद हे या लोकसभा निवडणुकीत आमची कामगिरी खालावण्याचे एक प्रमुख कारण आहे, अशी कबुली ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य पणाला लावणारे अण्णासाहेब पाटील यांच्या आत्महत्येनंतर मराठा समाजाच्या प्रगतीला हातभार लावणारे महामंडळ स्थापन करण्याची कल्पना तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या मनात आली नाही. आमच्या सरकारने सन 1995 मध्ये या महामंडळाची स्थापना केली. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गाच्या सर्व सवलती आणि सुविधा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्याच कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले. ते उच्च न्यायालयात टिकवून दाखवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात ते टिकवता आले नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ते पुन्हा मिळवले.
मराठा समाजासाठी इतके काम करूनही ते समाजातील तळागाळातील घटकापर्यंत आम्ही पोहोचवू शकलो नाही. त्यामुळे मराठा समाजाचा आमच्यावर रोष राहिला. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत आम्हाला बसला, असे पाटील यांनी सांगितले. या महत्त्वाच्या बाबीवर पक्षात विचारमंथन झाले असून मराठा समाजाला पक्षासोबत जोडून घेण्यासाठी काही उपाययोजना करण्याचे ठरले आहे, असेही ते म्हणाले
