अहंकारी सत्ताधाऱ्यांना RSSने सत्तेपासून दूर करावे – खासदार संजय राऊत
मुंबई : सत्ताधारी अहंकारी झाल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहंकार यांचे शिरोमणी असलेल्या सत्ताधाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्तेपासून दूर करावे, अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षांबरोबर सरकार स्थापन करण्यात भाजप आणि नरेंद्र मोदी यशस्वी झाले असले तरीही चारसो पार चा नारा देणाऱ्या भाजपची खासदार संख्या मागच्या निवडणुकीच्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर घटली आहे. त्याबाबत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी भाजप नेतृत्वावर कठोर टीका केली. सत्ताधारी पक्षाने प्रथम रामाची भक्ती केली. मात्र कालांतराने ते अहंकारी झाले. या अहंकारी नेतृत्वाला रोखण्यासाठीच रामाने त्यांना मर्यादित प्रमाणात यश दिले आणि रामाचा द्वेष करणाऱ्यांना त्याने पहिल्या क्रमांकापर्यंत येऊ दिले नाही. हा रामाचा न्याय आहे, असे उद्गार इंद्रेश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना भाजप नेतृत्वावर टीका केली. यावर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले, यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी देशातील लोकशाही टिकवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. आणीबाणीच्या काळात बाळासाहेब देवरस यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्यांनी तुरुंगवासही पत्करला. मागील दहा वर्षात अहंकाराचे आणि सुडाचे राजकारण सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते पुन्हा ती भूमिका घेतील, अशी आमची अपेक्षा होती. आता मात्र संघाच्या प्रमुख नेत्यांना देशाचे आणि भाजपचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या अहंकाराची जाणीव झालेली दिसून येत आहे. त्यामुळे संघाच्या नेत्यांनी आता पुढाकार घेऊन अहंकारी नेतृत्वाला दूर करावे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली.
