‘राष्ट्रीय पुस्तक मेळ्या’ची कोथरूडची शानदार सुरूवात
पुणे : भारतीय विचार साधना फौंडेशन आयोजित ‘राष्ट्रीय पुस्तक मेळ्याला’ आज (ता. ७) सुरवात झाली. हा मेळा तीन दिवस चालणार आहे. भारतीय संस्कृतीची, राष्ट्रप्रेमाची, आध्यात्माची, एकात्मतेची उर्जा वाचकांना मिळावी आणि वाचनाचे प्रमाण वाढत जावे या दृष्टीने या मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूडमधील बालशिक्षम मंदीर व आयएमसीसी इमारतीच्या तळमजल्यावर हे प्रदर्शन भरविण्यात आले असून ते सकाळी १० ते रात्री ९ या वेळात सुरू राहील.
दरम्यान उद्घाटनसमारंभानंतर यावेळी सावरकर अभ्यासक, लेखक अक्षय जोग यांच्या ‘दुर्लक्षित हिंदुहितवादी’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, माजी खासदार प्रदीप रावत, लेखक अक्षय जोग, रा.स्व. संघ छत्रपती संभाजी भाग संघचालक अनिल व्यास व भाविसा फौडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन भागवत आदींची उपस्थिती होती.
‘त्यांना काय वाटेल? याचा अपराधगंड स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या मनात सातत्याने रुजवण्यात आला आहे. तो दूर करून राष्ट्रीय विचारांची निर्भय मांडणी करण्याची आज गरज आहे’, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीतील अनेक हिंदुहितवादी नेते, विचारक दुर्लक्षित झाले, आजही अनेकांना त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती नाही, अशा हिंदुंचे हित जाणणाऱ्या विचारकांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्याचे काम अक्षय जोग यांनी आपल्या पुस्तकातून केले आहे. हिंदुंचं हित बघणऱ्यांना आता वेगळ्या दृष्टीकोनातून बघितले जाते, असे होता कामा नये, असे मत विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. तर, भारतात प्रबोधनात्मक चळवळींचा कालावधी हा अत्यंत कमी आहे, या चळवळींना बंगालपासून सुरुवात झाली, असे प्रतिपादन माजी खासदार प्रदीप रावत केले.
‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, राज नारायण बसू, नवगोपाळ मित्र, देवेंद्रनाथ ठाकूर आदींच्या विचार व कार्यातून हिंदूंच्या हिताच्या भूमिका ठळकपणे दिसतात. मात्र, त्याबाबत कोणी लिहीत वा बोलत नाही’, असे जोग यांनी सांगितले. प्रकाशन समारंभाचे सुत्रसंचालन मिलिंद भणगे यांनी केले.
याच मेळ्यात आज (शनिवार, ८ जून) सायंकाळी ४ ते ५ या वेळांत लेखक राजीव तांबे यांची बालगोपाळांसोबत गप्पांचा कार्यक्रम तर ९ जून रोजी ‘फाळणीच्या वेदना’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही कार्यक्रम आयएमसीसी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये सायंकाळी ४ वाजता होणार आहेत.
