ग्राहक पेठेच्या तांदूळ महोत्सवाला उत्साहात सुरुवात
पुणे : ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार तांदूळ मिळावा या उद्देशाने ग्राहक पेठेने सुरू केलेल्या ३१ व्या तांदूळ महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. महोत्सवामध्ये भोर, वेल्हा, मावळ, मुळशी या भागांतील थेट शेतकऱ्यांसह विविध राज्यांतील बासमती पासून आंबेमोर पर्यंत आणि इंद्रायणी पासून कोलम चिनोर पर्यंत सुमारे ६० प्रकारचे वाण उपलब्ध आहेत.
पुणे ग्राहक पेठेच्या ३१ व्या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या अध्यक्षा रेवती पैठणकर यांच्या हस्ते झाले. सदाशिव पेठेतील खजिना विहीर चौक येथे तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अॅण्ड कंपनीचे राजेश शहा आदी उपस्थित होते. यावेळी महोत्सवासाठी परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
रेवती पैठणकर म्हणाल्या, उत्तम गुणवत्ता आणि वाजवी किंमत यासाठी ग्राहक पेठ ओळखली जाते. ऑनलाइन खरेदी पेक्षा तांदूळ महोत्सवात येऊन खरेदी करण्याचा वेगळा अनुभव असतो. चोखंदळ पुणेकरांसाठी ३१ वर्षे तांदूळ महोत्सव सुरू ठेवणे, ही नक्कीच सोपी गोष्ट नाही, असेही त्यांनी सांगितले.
राजेश शहा म्हणाले, ग्राहक पेठ ही गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. ग्राहक पेठेच्या सहकार्यामुळे उत्तम प्रकारचे तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.
सूर्यकांत पाठक म्हणाले, अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यत या माध्यमातून पोहोचत आहे. तब्बल ६० प्रकारचे तांदूळ या महोत्सवात ग्राहकांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणे, हे याचे वैशिष्टय आहे. तांदूळ विक्रेत्यांची कोणतीही चेन यामध्ये नाही त्याच्यामुळे थेट उत्पादकाकडून ग्राहकांपर्यंत तांदूळ, ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून येतो.
