Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

भारताला नारीमुक्तीची नाही, तर नारी शक्तीची गरज – साध्वी ऋतंभरा

पुणे  : आपल्या देशात नारी मुक्तीचा विचार सातत्याने मांडला जात असला, तरी भारताची श्रेष्ठ परंपरा लक्षात घेता आपल्या देशाला नारी मुक्तीची नव्हे, तर नारी शक्तीची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन साध्वी ऋतंभरा दीदी यांनी शुक्रवारी केले.
राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना ‘राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार’ तसेच युवकांना ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी साध्वी ऋतंभरा दीदी बोलत होत्या.
‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्यात यावेळी व्यासपीठावर राम मंदिर निर्माण आंदोलनाच्या अग्रणी नायिका दीदी साध्वी ऋतंभरा, स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती, जेएनयुच्या कुलपति शांतिश्री धूलिपुडी पंडित, पद्मश्री मिलिंद कांबळे, सुनील देवधर आणि दिनेश होले उपस्थित होते. यावेळी पुण्याच्या माजी महापौर आणि आमदार स्व. मुक्ता टिळक यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कुणाल टिळक यांनी स्वीकारला.
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय कार्यकर्ते दादा वेदक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी
मा. का. देशपांडे, विज्ञान भारतीचे काशीनाथ देवधर, जनसेवा बँकेचे संस्थापक वसंतराव देवधर, उद्योजक गजेंद्र पवार, ईशान्य भारतातील कार्यकर्ते प्रशांत जोशी, अॅड. सत्यम सुराणा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
स्त्रिया स्वतंत्र असल्याचे चित्र जगभरातील इतर देशात निर्माण केले गेले असले तरी भारतातील स्त्रियांना जो सन्मान दिला जातो, तसा सन्मान मला विश्वात कुठेही दिसला नाही. असे सांगून साध्वी ऋतंभरा दीदी म्हणाल्या समाजात स्वतःचे स्थान महिलांना स्वतः निर्माण करता येते, तप, साधनेने हे शक्य आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, बालकाश्रम ही व्यवस्था समाजासाठी आदर्श व्यवस्था होऊ शकत नाही. कुटुंब आणि संस्कार यातून महिला आदर्श निर्माण करू शकतील.

अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दंडवत प्रणाम केला, परंपरेचा असा सन्मान करणारे ते पहिले पंतप्रधान आणि देशाचे सुपुत्र आहेत. असे साध्वी ऋतंभरा दीदी म्हणाल्या. अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम येत आहेत. माझ्या आनंदाला खरोखरच पारावार राहिलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात स्व. मुक्ता टिळक (मरणोत्तर) – क्षेत्र राजकीय, डॉ. सुचित्रा कराड-नागरे – शैक्षणिक, ममता सपकाळ – सामाजिक, उषा माळी – शैक्षणिक, उषा वाजपेयी – राजकीय, पुष्पाताई वागळे – राजकीय, सीमा चांदेकर – चित्रपट , शुभांगी भालेराव – सामाजिक, अंजली व नंदिनी गायकवाड गायिका – संगीत, शैला नाईक – प्राणीमित्र, डॉ. सुप्रिया पुराणिक – वैद्यकीय, प्रतिभा चंद्रन – पत्रकारिता, गीता पेडणेकर – उद्योग, नंदाताई बराटे – सामाजिक, सी. ए. रचना रानडे – आर्थिक, डॉ. जयश्री तोडकर – वैद्यकीय, पुष्पाताई वागळे – राजकीय, शैला देशपांडे – क्षेत्र समाजसेवा, यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले. यासोबत वीव्ध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या १४३ महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे तुषार दामगुडे, सुखदेव अडागळे, किशोर चव्हाण, शिवशंकर स्वामी, आशुतोष मुगळीकर, निलेश भिसे,अविनाश तायडे, आशुतोष झा, दत्तात्रेय मिरगणे पाटील, निलेश धायरकर, आनंद जाधव, महेश पवळे यांना विवेकानंद युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वामी विवेकानंद आणि हिंदुत्व यांना आम्ही एक दुसऱ्याचा पर्याय मानतो. महिलांना सर्व भौतिक स्वातंत्र्य पश्चिमी देशात आहे. मात्र सन्मान आणि खरे स्वातंत्र्य भारतातच आहे, असे ठाम प्रतिपादन स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी केले.

राजमाता जिजाऊ ह्या एक माता आणि थोर आचार्य होत्या. पुणे शहर माझी कर्मभूमी आहे. पुण्यासारखे चांगले लोक मी इतर ठिकाणी पाहिले नाहीत. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराचे नेतृत्व सुनील देवधर यांनी करावे, अशी अपेक्षा डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी व्यक्त केली.
माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांचे कार्य देशभर सुरु आहे आणि पुणे हे ही त्यांचे ‘होम’च आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांचा परिणाम आहे की, तरूणांनी स्टार्टअपच्या माध्यमातून क्रांती केली आहे, साडे चार लाख लोकांना रोजगार एकशे सोळा स्टार्टअप युनिकॉन आहेत. नव्या युगातला हेच तरूण उद्योजक जगाला दिशा देतील, शिखरावर पोहचवतील. असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले.

 


राष्ट्राच्या उद्धारासाठी सर्व महिलांनी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनीच हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली. भारताला विकसित करण्यासाठी, आपल्या युवा पिढीसमोर जिजाऊंचाच आदर्श आहे. युवक आणि युवतींनी जिजाऊंचा आदर्श घेऊनच जीवनात वाटचाल करावी. – सुनील देवधर

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading