रामभक्त कॉंग्रेसच्या ‘या’ बहिष्काराचा बदला नक्की घेणार – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
कोराडी (नागपूर) : काँग्रेसने राम मंदिराचे उद्घघाटनाचे निमंत्रण नाकारून देशातील कोट्यवधी रामभक्तांचा अपमान केला. काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसने प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारले होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिराचे उद्घाटन होत असताना दिलेले निमंत्रण नाकारून हिंदूविरोधी भूमिका घेतली आहे. देशातील रामभक्त कॉंग्रेसच्या या बहिष्काराचा बदला नक्की घेईल, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, काँग्रेसने यापूर्वी ही रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. येथे ८ हजार वर्षांपूर्वी प्रभू श्री रामाचा जन्म झाला होता, हे सांगण्यासाठी मोदींना पंतप्रधान व्हावे लागले. केवळ एका समाजाची मतं मिळावीत व त्या समाजाच्या राजकारणाकरिता वस्तूस्थिती लपवली. लाखो रामभक्तांच्या रक्ताने कॉंग्रेसचे हात माखलेले आहेत. रामभक्त कॉंग्रेसचा हिशेब चुकता केल्या शिवाय राहणार नाही.
२२ जानेवारीला सुट्टी जाहीर करा
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणष्ठापना होणार आहे. या दिवशी भारतातील कोट्यवधी भारतीय घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करणार असून ही जगातली सर्वांत मोठी दिवाळी ठरेल. या उत्सवासाठी राज्यात २२ जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
विधानसभा अध्यक्षांचा निकाल मेरीटवर
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल एतिहासिक आहे, असे सांगून ते म्हणाले की, या जे नियम शिवसेनासाठी लागू झाले तेच राष्ट्रवादीसाठी लागू होतील. सुप्रीम कोर्टाने, निवडणूक आयोगाने व विधानसभा अध्यक्षांनी ज्या मेरीटवर निकाल दिला तेच इतरांनाही लागू होतील. निकालावर सर्वच पक्षांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. निकालासाठी विधानसभा अध्यक्षांचे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत.
जागेबाबत कोणतीही तडजोड नाही
महायुतीचे १४ तारखेपासून बुथ, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय मेळावे होणार आहेत. महायुतीच्या नेतृत्वाने एकच फार्म्युला ठरविला आहे, जी जागा जो पक्ष जिंकू शकतो त्यात कोणतेही तडजोड केली जाणार नाही. भाजपाचा कोणताही आग्रह नाही, संसदीय मंडळ व राज्यातील तिन्ही नेते समन्वयाने जागाचा निर्णय घेतील, ज्याला जी जागा मिळणार तेथे ५१% मते मिळवून महायुतीचा विजय व्हावा यासाठी भाजपा- शिंदे व अजित पवारांना ताकद देणार आहे.
