पुणे शहर ही खऱ्या अर्थाने धार्मिक राजधानी – डाॅ. सदानंद मोरे
पुणे : पुणे शहराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. स्वराज्याची पायाभरणी पुण्यात झाली. पुण्याला सांस्कृतिक राजधानी असेही म्हणतात. मारुती, गणपती, शंकराची अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पुण्यात आहेत. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना अनेक मंदिरे पुण्यात बांधली. त्यामुळे या मंदिरांना ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. खऱ्या अर्थाने पुणे शहर ही धार्मिक राजधानी आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने कथा एका मंदिराची या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन टिळक चौकातील विठ्ठल मंदिरात करण्यात आले होते. पुस्तकाचे प्रकाशन सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी लेखक मंगेश चव्हाण, शिरीष मोहिते, विश्वास भोर, अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दिपक थोरात, सचिव नरेंद्र गाजरे, सहसचिव बाळासाहेब ताठे, उत्सव प्रमुख महेश अंबिके, ज्येष्ठ सदस्य रमेश मणियार उपस्थित होते. अमर लांडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनसाठी सहकार्य केले.
डाॅ. सदानंद मोरे म्हणाले, श्री लकडीपूल विठ्ठल मंदिराचा इतिहास मोठा आहे, परंतु तो विविध ठिकाणी विखुरलेला आहे. पुस्तकाच्या माध्यमातून मंदिराचा इतिहास एकत्र मांडण्यात आला आहे. या पुस्तकात कोणत्याही आख्यायिका नाहीत तर पुराव्यासकट माहिती देण्यात आली आहे. लकडीपूल विठ्ठल मंदिर हे स्वातंत्र लढ्याच्या काळात महत्त्वाचे केंद्र होते. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाची उभारणी येथूनच झाली. असे हे मंदिर पुन्हा पुणे शहराच्या केंद्रस्थानी आले पाहिजे, अशी आशा त्यांनी व्यक्त केले.
दिपक थोरात म्हणाले, टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर हे पेशवेकालीन २०० वर्षे पुरातन आहे. हे मंदिर अनेक ऐतिहासिक घडामोडींचे साक्षिदार आहे. मंदिराचा हा इतिहास एकाच ठिकाणी वाचायला मिळावा, यासाठी पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. शुभम पळसकर याने सूत्रसंचालन केले.
