बोलघेवडे भाजप नेते गप्प का? सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय? माजी आमदार मोहन जोशी यांचा खडा सवाल
पुणे – ससून सर्वोपचार रुग्णालयातील अमली पदार्थांच्या व्यवहाराचे रॅकेट उघड होऊन ११ दिवस लोटले तरी राज्य सरकार ढिम्मच आहे, बोलघेवडे भाजप नेते चुपचाप बसले आहेत, असा आरोप माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला असून, या प्रकरणात राज्य सरकार कोणत्या मंत्र्याला वाचवतंय का? असा सवालही जोशी यांनी केला आहे.
सामान्य लोकांसाठी आधार असलेले ससून सर्वोपचार रुग्णालय अमली पदार्थांच्या तस्करीचा अड्डा बनले, ही बाब पुणेकरांना धक्का देणारी आहे. वास्तविक पाहता हे प्रकरण उघडकीस येताच राज्याच्या मुख्य मंत्री आणि दोन उपमुख्य मंत्र्यांनी दखल घेऊन कठोर कारवाया करायला हव्या होत्या. ते अजूनही ढिम्मच आहे आणि एवढा शरमेचा प्रकार घडलेला असतानाही एरवी कोणत्याही प्रश्नावर वायफळ बडबड करणारे भाजपचे बोलघेवडे नेते आता मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांचे मौनही संतापजनक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
अंमली पदार्थ तस्करी आणि त्यातील आरोपी ललित पाटील याचे पलायन ही बाब आणखी धक्कादायक आहे. महायुती सरकारमधील एका मंत्र्याशी ललित पाटील याचे कनेक्शन होते, हे ही उघड होऊ लागलेले आहे. वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांच्या चौकशा समित्या नेमणे हा निव्वळ फार्स आहे. समित्या कसल्या नेमताय? ससूनमधील संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, अशी मागणी आहे. या प्रकरणात महायुतीतील एका मंत्र्याला वाचविण्याचा खटाटोप चाललाय का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.
सामान्य माणसाचा आधार असलेल्या ससूनमध्ये अमली पदार्थांची तस्करी चालते, हा प्रकारच अस्वस्थ करणारा आहे. मुख्य मंत्री आणि उपमुख्य मंत्र्यांनी यावर कडक उपाययोजना कराव्यात, अन्यथा असे प्रकार आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
