महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 50 हुन अधिक मृत्यू खासदार संजय राऊत यांचा दावा
मुंबईः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे ५० हून अधिक श्रीसदस्यांचे निधन झाले आहे. त्यावर आता भाजप आणि फडणवीस आंदोलन का करत नाहीत. ते का गप्प आहेत. फडणवीस यांच्या चेहऱ्यावर साधा दुःखाचा भाव दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला बूच बसलं आहे. ते श्रीसदस्यांच्या निधनावर काहीच बोलत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केली.
खासदार राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सध्या मोगलाई सुरु आहे. पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जातंय. त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत. आमचे आमदार नितीन देशमुखे हे पाण्यासाठी आंदोलन करत होते. तेथे खारं पाणी येत. नवजात बालक ते पाणी पितात. त्यांना याचा नाहक त्रास होतो. या पाण्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होत आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून नितीन देशमुख हे आंदोलन करत होते. त्यांना फडणवीसांच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी आंदोलन केले होते. आता ते दुसऱ्यांना आंदोलन करु देत नाहीत. तसेच विविध मुद्द्यांवर लोकांना आंदोलन करु दिली जात नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही सरकार गप्प आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादीत जे काही सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण महाविकास आघाडीवर मी बोलतच राहणार आहे. राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे हे सत्य आहे. सत्य मी बोलणारच आहे. तसेच भाजप दबावतंत्र वापरून फोडाफोडीचं राजकरण करत आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, खारघर दुर्घटनेवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, या मागणीला खासदार संजय राऊत यांनीही पाठिंबा देत राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली.
