Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

बालनाट्य, चित्रपट आणि बालसाहित्य या तीन अंगाने मुलांचा विकास करावा – लक्ष्मीकांत देशमुख


पुणे : प्रत्येक पालक आपल्या मुलांचे शरिर व मन निरोगी राहण्यासाठी सातत्याने काळजी घेत असतो. त्याचप्रमाणे निरोगी मन राहण्यासाठी बालनाट्य, चित्रपट आणि बालसाहित्य या तीन अंगाने मुलांचा विकास करण्याची पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
‘संवाद’ पुणे आणि ‘कावरे आयस्क्रीम प्रा. लि.’तर्फे आयोजित बालचमूंचा सुट्टीतील आनंद द्विगुणीत करण्यासाठी अलबत्या गलबत्या, ढब्बू ढोल रिमोट गोल अशा 5 धमाल बालनाट्यांचा ‘बालनाट्य महोत्सवा’चे उदघाटन कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रख्यात बाल साहित्यकार ल.म. कडू अध्यक्षस्थानी होते. कावरे आयस्क्रीम प्रा. लि.चे’ चेअरमन राजूशेठ कावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रकाश पारखी, निकिता मोघे, रंगभाषा संस्थेच्या वैष्णवी जोशी, अ‍ॅड. मंदार जोशी आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन आणि कावरेे आयस्क्रीमचे राजुशेठ कावरे हे मुलांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून बालमहोत्सव आयोजित करतात. बालकांसाठी सातत्याने महोत्सव भरविणे ही सोपी गोष्ट नाही. उद्याचा सक्षम नागरिक करण्याचा हा त्यांचा खटाटोप खुप महत्वाचा असल्याचे यावेळी त्यांनी त्यांचे कौतूक केले. त्यांचा महोत्सवाला पालकांनी भरभरुन प्रतिसाद मिळावा, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.
देशमुख म्हणाले, पालकांनी आपल्या पाल्यांना नाटके पाहण्यासाठी आणले पाहिजे. प्रत्यक्षस्थळी बालनाट्या पाहणे ही जादू असून ती मुलांनी अनुभवयाला हवी. मुलांनी नाटक पाहिल्यास त्यांच्यात कल्पनाशक्तीत वाढ होण्याबरोब क्रिएटिव्हीत वाढ होते. उन्हाळ्यातीच्या सुटीतील वेळेचा सदुपयोग आपल्या पाल्यांसाठी नियोजन करायला हवे. मुलांच्या बुद्धीला, कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी नाटक, चित्रपट पाहण्याबरोबर मराठी पुस्तक वाचनात रुची वाढविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवा. पालकांनी मराठी गोष्टींचे पुस्तके आपल्या पाल्यांना द्यावी, त्यातून ते आपले भावविश्व निर्माण करीत असतो, त्यातून आपली कल्पनाशक्ती तो तयार करीत असतो.
ल. म. कडू म्हणाले, नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून प्रबोधनाचे साधन आहे. नाटकांमुळे मुलांच्या मनावर चांगले संस्कार होतात. गेली 27 वर्षांपासून नाट्यसंस्काराचा खटाटोप महाजन व कावरे यांच्याकडून होत आहे. जी मुले नाटक पाहण्यासाठी येत होती. ती आज पालक म्हणून येत आहे. या महोत्सवात सातत्य टिकवून ठेवले आहे. बालवयात संस्कार होणे फार महत्वाचे आहे. या महोत्सवात आपल्या पाल्यांवर नक्कीच संस्कार मिळतील असेही यावेळी त्यांनी सांगितले. सुनिल महाजन यांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले, कोरोनाकाळात दोन वर्षे महोत्सव भरविता आला नाही. चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत होता. मात्र एक पडदा चित्रपटगृह बंद पडल्याने बालनाट्य महोत्सव सुरु करण्यात आला आहे. राजुशेठ कावरे म्हणाले, गेली 27 वर्षांपासून बालचित्रपट महोत्सव भरविण्यात येतो. यंदा बालनाट्याची परंपरा सुरु केली आहे. महोत्सवाला पालकांचा प्रतिसाद मिळावा असे, आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केतकी महाजन-बोरकर यांनी केले. तर निकिता मोघे यांनी आभार मानले.
दि. 21 एप्रिल या कालावधीत रोज दुपारी 1.00 वाजता होणार्‍या या बालनाट्य महोत्सवात ‘एकदा काय झालं?’, ‘कवितांच्या गुदगुल्या’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘ाळपसश्रळीह मिडियम’ आणि ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ ही पाच बालनाट्य सादर होतील. या बालनाट्यांना येणारे बालचमू आणि त्यांचे पालक या सर्वांना कावरे आयस्क्रीम प्रा.लि. तर्फे आयस्क्रीम मोफत देऊन त्यांच्या आनंदात भर घालण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading