सामाजिक स्वार्थ ठेवून संचालकांनी काम केल्यास सहकार क्षेत्राची प्रगाती : विद्याधर अनास्कर
पुणे : सभासदांना बँकेचे उपविधी तयार करण्याचे अधिकार असतानाही सहकार क्षेत्रातील बँकांची मालकी कुणाची हे सभासदांना माहित नसते. बँकेचे सभासद, सर्वसामान्य नागरिक यांना बँकेच्या कामकाजाविषयी, आर्थिक व्यवहाराविषयी माहिती नसल्याने बँकेविषयी अफवा पसरण्यास वेळ लागत नाही. अफवा पसरणे हे बँकिंग क्षेत्रासाठी घातक आहे. सहकारी बँकांची प्रतिमा चांगली राखायची असेल तर आपण चांगले काय करू शकतो हे सांगितले गेले पाहिजे. संचालकांनी सामाजिक स्वार्थ ठरवून काम केल्यास सहकार क्षेत्राला गती मिळेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ बॅकिंगतज्ज्ञ व शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले.
संस्कृती प्रकाशन आणि आडकर फौंडेशनतर्फे सातारा जनता सहकारी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी लिखित ‘मोठ्या बँकेची छोटी गोष्ट‘ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 19) पत्रकार भवन येथे अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार व्यासपीठावर होते.
अनास्कर पुढे म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा नागरी सहकारी बँकांना अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पैसे अशा बँकांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत येत असतात. ते पुढे म्हणाले, नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता नसल्याने सहकार क्षेत्रातील बँकेच्या संचालकांना व्यवहारांमध्ये खूप खबरदारी घ्यावी लागते. कामकाज करताना एकमत खूप आवश्यक असते. त्याचप्रमाणे आर्थिक शिस्तही आवश्यक असते. दुसऱ्याच्या चुकांवर बोट न ठेवता आपण काय चांगले निर्णय घेतले आहेत ते लोकांसमोर मांडले पाहिजेत. पुस्तकाविषयी बोलताना ते म्हणाले, बँकेसंदर्भातील जे जे काही घडले आहे ते अगदी प्रांजळपणे मांडले आहे. स्वत:च्या हातून ज्या चुका झाल्या आहेत त्याही लेखकाने मोठ्या मनाने कबूल केल्या आहेत.
सहकार क्षेत्रातील बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत, असे नमूद करून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संस्थांमध्ये संचालक साहित्य क्षेत्राशी निगडित असावा, वैज्ञानिक क्षेत्रातील संचालक विज्ञानविषयक माहिती असणारा असावा असा जेव्हा आग्रह असतो तेव्हा अर्थव्यवस्था समजणाऱ्या व्यक्ती बँकांच्या संचालक मंडळात का असू नयेत? ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना राष्ट्रीयकृत बँका आपल्याशा वाटत नाहीत. ग्रामीण अर्थकारण आणि ग्रामीण भागाशी जोडलेल्या सहकारी बँका टिकल्या पाहिजेत. सहकार क्षेत्रात सेवाभाव महत्त्वाचा असतो.
विनोद कुलकर्णी यांनी पुस्तक लिहिण्यामागील भूमिका विशद केली. बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या याचा प्रवास उलगडला.
सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. तर ॲड. प्रमोद आडकर यांनी शुभेच्छा दिल्या. स्वागत ॲड. प्रमोद आडकर आणि सुनिताराजे पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
