Thursday, August 27, 2026
ENTERTAINMENTLatest News

लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान आता मालिकारूपात

झी मराठी ही फक्त एक वाहिनी नसून मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. या वाहिनीवरील कार्यक्रमांमधून नेहमीच मराठी संस्कृतीचं प्रतिबिंब आपण पाहत आलो आहोत. बदल घडत नाही तो घडवावा लागतो, या दिशेने सध्या झी मराठी वाहिनीचा प्रवास सुरू आहे. आणि हाच विचार ज्यांच्या धाडसी जीवनाचा पाया आहे, ते लोकमान्य टिळक या दृष्टीकोनातून समजून घेणं, जाणून घेणं आजच्या काळाशी अगदी सुसंगत आहे. झी मराठी वाहिनीवर लवकरच येत आहे, लोकमान्य ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा.

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जाज्वल्य देशाभिमान शाळकरी वयात असल्यापासून आपल्या अंगी भिनलेला आहे. लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास आपल्याला तोंडपाठ आहे. टिळकांचं राष्ट्रप्रेम, त्यांचं करारी व्यक्तिमत्त्व आपल्या प्रत्येकाच्या मनात वसलेलं आहे. त्यामुळे आजही लोकमान्य असा शब्द जरी उच्चारला तरी टिळकांचा प्रभावी इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यांच्या प्रभावी कृतीतून त्यांनी घालून दिलेला एकत्र येण्याचा वसा आपण आजही जपतो आहोत.

लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्त्व राजकीय, सामाजिक आणि कौंटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहे. आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडता येण्याच्या कसोटी काळात सध्या आपण आहोत. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्त्वशैली आपल्याकडेही असावी, असे वाटण्याचा हा काळ आहे, म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ते जहाल विचारांचे थोर भारतीय नेते होते. घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. ह्या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष परांडकर यांनी तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स  हे या मालिकेचे निर्मिते आहेत.  या मालिकेतून अभिनेता क्षितीज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading