बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या; खासदार संजय राऊत यांची मागणी
मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबरीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते , खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्र सोडत अनेक आक्षेप घेतले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अनेक शिवसैनिक तसेच नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो शेअर करत अभिवादन केले.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे ढोंगी वारसदार आहेत. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुळात बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्हीच आहोत आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासासोबत त्यांच्या विचारांसोबत राहू, असे ते म्हणाले.
वीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही? तुमचं एवढंच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेबांनाही भारतरत्न द्या असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. शिंदे गटाला उद्देशून बोलतांना राऊत म्हणाले की, बाळासाहेबांच्या नावाने तोतये निर्माण झालेले आहेत. मात्र ते टिकणार नाहीत. या महाराष्ट्रात ढोंग चालणार नाही, त्याला लाथ मारली पाहिजे. बाळासाहेबांनाही अशी ढोंगे आवडत नव्हती, असा चिमटा राऊतांनी काढला.
हे नाते खुप जुने आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
ये रिश्ता बहोत पुराना है..
साहेब..
विनम्र अभिवादन !
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/vDhofuiVbi
