ठाणे शहर आणि परिसरामध्ये सुरक्षित रिक्षा सुरक्षित प्रवास मोहीम सुरू करा: डॉ. नीलम गोऱ्हे
ठाणे : ठाणे शहर आणि परिसरात गेले काही दिवस महिला अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. या घटना सातत्याने ठाणे सारख्या मराठी बहुल भागात कोणी समाजकंटक मुद्दाम घडवून आणत आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.
काल दिनांक १४ ऑक्टोबर रोजी देखील एका रिक्षा चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याची आणि तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. भर रस्त्यावर अशा पद्धतीने वर्तन करून या रिक्षा चालकाने महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी हानी पोहोचवली आहे.
या पार्श्वभूमीवर आज ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज दूरध्वनीवरून चर्चा केली आहे अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटना लक्षात घेता
परिवहन विभाग व ठाणें पोलिसांनी मिळुन ‘ सुरक्षित प्रवास – सुरक्षित रिक्षा’ ही मोहिम हाती घेण्यास सांगितले आहे. यासोबत ठाणे शहर आणि परिसरामध्ये महिला रिक्षा चालकांना प्राधान्याने महिला प्रवासी वाहतुकीसाठी विचार करण्यात यावा. महिला रिक्षा चालक आणि महिला प्रवासी यांच्या सोयीनुसार पहाटे सहा ते सकाळी नऊ आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ अशी वेळ उपलब्ध करून देण्यात यावी. या महिला रिक्षा चालकांना त्यांच्या रिक्षा उभ्या करण्यासाठी रिक्षा थांब्यांवर वर्दळीच्या ठिकाणी बस स्थानके रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याबद्दल प्राधान्याने विचार व्हावा, असे पर्याय सुचवले आहेत.
याविषयी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, परिवहन विभाग, पोलिस आयुक्त, जिल्हाअधिकारी ठाणे यांना लेखी निवेदनही उपसभापती कार्यालयाकडून देण्यात येत आहे. यामुळे अशा प्रकारच्या घटनांवर काही प्रमाणात आळा बसू शकेल तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना समाजातील महिलांमध्ये सुरक्षितता निर्माण होऊ शकेल. या विषयावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन सिंग यांनी दिले आहे.