Friday, September 11, 2026
Latest NewsPUNE

‘मिस्टेड ट्रेल्स’ कादंबरीद्वारे वाचकांच्या कल्पनाशक्तीला वाव : प्रसाद वनारसे

पुणे : एक भारतीय लेखक तर दुसरा श्रीलंकन. दोघांच्या भाषा भिन्न. असे असताना एकमेकांशी लेखनाविषयी चर्चा-संपर्क न करता पुस्तक कसे लिहिणार या विषयी मी साशंक होतो; पण पुस्तक जेव्हा हाती आले तेव्हा पुस्तकवाचन हा मनोरंजनात्मक आणि खिळवून ठेवणारा अनुभव होता. ‘मिस्टेड ट्रेल्स’ या कादंबरीद्वारे मनात अनेक प्रतिमा तयार होतात. यात अनेक आकृतीबंधाचा समावेश आहे. वाचकाच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी अशी या कादंबरीची मांडणी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद वनारसे यांनी केले.

पुण्यातील नाट्यविषयक अभ्यासक डॉ. अजय जोशी आणि श्रीलंकेतील कला-नाट्य समीक्षक दिलशान बोआँगे यांच्या अनोख्या साद-प्रतिसादातून रंजक-नाट्य प्रसंगांवर आधारित साकारलेल्या ‘मिस्टेड ट्रेल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ( झाले. त्यावेळी वनारसे बोलत होते. रानडे इन्स्टिट्यूटच्या उज्ज्वला बर्वे, पत्रकार सागर गोखले आणि वनारसे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोशल मीडियाद्वारे दिलशान बोआँगे आणि नंदना हे श्रीलंकेतून सहभागी झाले होते.

वनारसे म्हणाले, ही कादंबरी वर्णनात्मक नसून मुक्त व्यक्तिनिष्ठ आहे. काही ठिकाणी ही कादंबरी दोन लेखकांनी लिहिली आहे यावर विश्वासच बसत नाही. दोन लेखकांनी एक पुस्तक लिहिणे हा एक प्रयोग नव्हता तर एक प्रवास होता, असे जाणवते. ही कादंबरी प्रत्येकाला वेगळी अनुभूती देणारी ठरू शकते.
सागर गोखले म्हणाले, दोन भिन्न देशातील, भिन्न संस्कृतीतील लेखकांनी एकत्रित पुस्तक लिहिणे ही संकल्पना माझ्यासाठी नाविन्यपूर्ण होती. या कादंबरीतील पात्रांची रचना, कथा, संकल्पना वाचताना हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते.
ही कादंबरी म्हणजे एक अखंडितपणे चाललेले निवेदन आहे, असे वाटते. ही कादंबरी वाचकाचा ताबा घेण्यात यशस्वी होते. एका कथाकाराचा शोध घेणारी ही एक मनोरंजनात्मक कादंबरी आहे, असे विवेचन उज्ज्वला बर्वे यांनी केले.
‘नमस्कार, आपल्या सर्वांचे श्रीलंकेतून मन:पूर्वक स्वागत’ अशा शब्दात मनोगताची सुरुवात करून दिलशान बोआँगे यांनी लेखकाच्या एकांतातून कथेची निर्मिती होते. भिन्न देशातील लेखक लेखन करीत असाताना कादंबरीने अनेक अनपेक्षित वळणे घेतली. कादंबरीतील पात्रांशी खेळत आपल्या लिखाणात अनेक रुपांतरे होत गेली. सहलेखकाच्या लेखनाचे निरिक्षण करण्याचा संयम शिकण्यास मिळाला.

प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत डॉ. माधवी वैद्य, दिलीप वैद्य यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading