उद्योगप्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरे संतापले
मुंबई :राज्यात येऊ घातलेला वेदांता आणि फॉक्सकॉनचा उद्योग गुजरातला वळवण्यात आला आहे. यावरून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर आसूड ओढले आहेत. हा प्रकल्प राज्यात येणार हे ९५ टक्के ठरलेले असताना महाराष्ट्राबाहेर का गेला याचं उत्तर सरकारने द्यावं असं आव्हान आदित्य ठाकरेंनी केलं आहे. तसंच, राज्यातील सरकार हे स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके असल्याचीही टीका आदित्य ठाकरेंनी केली.
या उद्योगप्रकल्पासाठी आम्ही मराठवाडा, विदर्भ, पुण्यात दौरे केले होते. तांत्रिक, आर्थिकरित्या तळेगाव ही जागा निश्चित करण्यात आली होती. पावणे दोन लाख कोटींचा हा प्रकल्प होता. १६० छोटे-मोठे व्यावसायिक यामुळे एकत्रित येणार होते. एकूण जवळपास ७० लाख रोजगार निर्माण होणार होता. पण, अचानक ही कंपनी गुजरातला जात आहे. सामंजस्य करार सोहळा आज झाला. हा उद्योग महाराष्ट्रात येणं ९५ टक्के ठरलं होती. मग अशावेळी हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात का गेला? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
जी कंपनी आपल्या राज्यात जूनपर्यंत येत होती. २६ जुलैपर्यंत या सरकारच्या मंत्र्यांनीही या प्रकल्पाबाबत ट्विट केलं आहे. मग ही कंपनी इथेच येणार असं ठरलेलं असताना दुसऱ्या राज्यात का गेली, राज्यात सरकार आहे की नाही? राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती, ती शेवटच्या मिनिटाला गुजरातला का गेली? ही गुंतवणूक राज्यातून का निघून गेली?
महाराष्ट्रातील तरुण बेरोजगारांसाठी हा प्रश्न मी विचारणारच. राज्यातील १ लाख लोकांना रोजगार मिळाला असता. पण यांच्यामुळे हा रोजगार आता मिळणार नाही.
