शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचा झाला पाहिजे -रामदास आठवले
पुणे : शिवसेनेतील बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणती? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिंदे गटाकडून वारंवार नवनवे दावे केले जात आहे. पक्षाच्या गटनेतेपदापासून सुरु झालेले दावा थेट पक्षचिन्हापर्यंत येऊन थांबले.सध्या शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे.
अशातच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दसरा मेळाव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे आणि शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचा झाला पाहिजे.असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
रामदास आठवले हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. रामदास आठवले यांचा पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे वार्तालाप आयोजित केला होता. तेव्हा ते बोलत होते. या वार्तालापला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे, खजिनदार अभिजीत बारभाई उपस्थित होते.
आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार आहे. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणूक रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या निवडणूक चिन्हावर लढवणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
लोकसभेसाठी आम्हाला भाजपने यापूर्वी 2 ते तीन जागा दिल्या होत्या, मात्र त्या जागांवर आम्ही निवडणूक आलो नाही. विधानसभेला हि आम्हाला जागा मिळतात.पण आमची माणसे निवडणूक येत नाहीत.अशी खंतही आठवले यांनी व्यक्त केली. शिवसेना कोणाची आहे याचा अजून निकाल द्यायचा आहे. त्यावर रामदास आठवले म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल. शिंदे यांच्या मागे दोन तृतीयांश आमदार आहेत.त्याचबरोबर खासदार हि आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल. असे रामदास आठवले म्हणाले.