देशभक्तीपर गीते गात आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
पुणे : वंदे मातरम…भारतमाता की जय…अशा घोषणा देत, ‘ जिंकू किंवा मरू’ …’ ऊठा राष्ट्रवीर हो’ अशी स्फुरण गीते उत्स्फूर्तपणे म्हणत देशभक्तीची साक्ष देत आर्यन्स वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रभात फेरी काढली. यावेळी क्रांतिकारकांच्या वेषात विद्यार्थी प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते.
तब्बल १२०० पेक्षा अधिक विद्यार्थी या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आर्यन्स वर्ल्ड स्कूल चे संस्थापक मिलिंद लडगे,प्रतिभा लडगे, प्रणव लडगे , मुख्याध्यापिका वैशाली कुलकर्णी, पर्यवेक्षिका कृपा अय्यर उपस्थित होते. शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग घेतला. चिंतामणी नगर, तीन हत्ती चौक, गोयल गंगा, राहूल पार्क, सन सिटी, गोकुळ नगर, बिबवेवाडी या ठिकाणी प्रभात फेरी काढण्यात आली होती. साधारण २७ गट होते प्रत्येक गटात ४० ते ५० विद्यार्थी होते.
मिलिंद लडगे म्हणाले, प्रभात फेरी, क्रांतिकारकांचे स्मरण करणे सगळे आता विस्मरणात चालले आहे. आपला इतिहास मुलांना कायम स्वरूपी स्मरणात रहावा यासाठी या प्रभात फेरीचा खटाटोप केला आहे. ही चळवळ अशीच पुढे चालू राहीली पाहीजे व पुढील वर्षी इतर शाळांनी स्फूर्ती घेऊन अश्या प्रकारे प्रभात फेरी काढली पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वैशाली कुलकर्णी म्हणाल्या, पूर्वीच्या काळी स्वातंत्र्य मिळण्याआधी प्रभात फेरी काढली जायची. ज्यामध्ये स्वातंत्र्यावरील स्फुरण गीत, समाज प्रबोधन करणारे, अन्यायाविरूध्द आवाज ऊठवणारे गीत असायचे. अशीच प्रभात फेरी काढून आम्ही स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले. सन १९८० – १९९० मध्ये या प्रभात फेऱ्या शाळाशाळांमधून व्हायच्या. त्यावेळी देशभक्तीने संपूर्ण आसमंत दुमदुमून जायचा.