उदय सामंत हल्ला प्रकरणी सहा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर
पुणे: गेल्या 2 ऑगस्टला शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला केला गेला त्यामुळे पुण्यातील राजकारण हे चांगलेच तापले.
या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काचही फुटली होती. आम्हाला तानाजी सावंत यांना अडवायचं होतं. मात्र गाडीत उदय सामंत निघाले, अशाही प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर इथल्या शिवसैनिकांनी दिल्या होत्या. तसेच बंडखोरांना तुम्ही आमदार दिसतील तिथे ठोकणार, असा कडकडीत इशारा दिला होता. दुसऱ्याच दिवशी या हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.गुन्ह्यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन नारायण थोरात, राजेश पळसकर, संभाजी थोरवे, सूरज लोखंडे आणि चंदन साळुंके यांनी अटक करण्यात आली होती.
मात्र या शिवसैनिकांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे. या प्रकरणातील सहा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आरोपींची वकील विजयसिंह पाटील यांनी दिली.