Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही; मुख्यमंत्र्यांनी लेखी प्रतिक्रिया वाचून दाखवली

मुंबई  : ‘खरं म्हणजे, राज्यपालांचे विधान हे वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. आम्हाला ते मान्य नाही. मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.  मात्र मुख्यमंत्र्यांनी ही लेखी प्रतिक्रिया वाचून दाखवली .

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे अडचणीत सापडले आहे. त्यांच्या विधानावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यपालांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

‘खरं म्हणजे, राज्यपालांचे विधान हे वैयक्तिक आहे. आम्हाला ते मान्य नाही. मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही, मुंबईसाठी 105 जणांनी आहुती दिली आहे, त्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. मराठी माणसामुळे मुंबईमुळे वैभव प्राप्त झाले आहे, असंही शिंदे म्हणाले.

याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खुलासा केला आहे. राज्यपालांनी देखील खुलासा केला आहे. परंतु, एवढंच सांगेल, राज्यपाल हे मोठे पद आहे. त्यामुळे कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतहा मुंबईत मराठी माणसाचे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई उभी राहिली आहे. मुंबईमध्ये परराज्यातील लोक सुद्धा रोजगारासाठी आली आहेत, असंही शिंदे म्हणाले.

मुंबईची जी क्षमता आहे, ती मराठी माणसांमुळे आहे. मराठी माणसांनी मुंबईची अस्मिता जपली आहे. त्या अस्मितेचा कुणीही अवमान करू नये. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, त्यांनी शिवसेनाही मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी उभी केली आहे. मुंबईवर अनेक प्रसंग आले, अनेक संकट पाहिली, त्या काळात बाळासाहेबांची शिवसेना कायम पाठिशी राहिली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या विधानांशी आम्ही सहमत नाही, आम्हाला ते मान्य नाही, असं शिंदेंनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading