भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या भक्ताची कधीही उपेक्षा होत नाही – कीर्तनकार ह.भ.प.दर्शनबुवा वझे
पुणे : भक्ताने भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवावा, त्यामुळे भगवंत सदैव त्याच्या पाठीशी उभा राहतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की, जो भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्या भक्ताची कधीही उपेक्षा होत नाही, असे प्रतिपादन कीर्तनकार ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांनी केले.
श्री रामजी संस्थान तुळशीबागेच्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिरात कामिका एकादशी निमित्त ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे किर्तन झाले. ‘ निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म ‘ या विषयावर निरूपण केले. कामिका एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात पवमान अभिषेक व पूजा करण्यात आली. यावेळी फुलांची सजावट देखील करण्यात आली होती. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
ह.भ.प. दर्शनबुवा वझे म्हणाले, कामिका एकादशीच्या व्रताने मनातील सर्व इच्छा ‘कामना’ त्त्वरेने पूर्ण होतात. भगवान विष्णूंना तुलसीपत्र अतिशय प्रिय असल्याने ते भगवंतांना आजच्या दिवशी अर्पण केल्यास भगवंत प्रसन्न होतात, असे वर्णन एकादशी महात्म्यामध्ये येते, तिथे तुळशीचे महत्त्व वर्णन केलेले दिसते असेही त्यांनी सांगितले.