लोक नंतर अशांना दारात उभंही करीत नाही – नितीन गडकरी
मुंबई -राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यात ‘शॉर्ट कट’ चालत नाही. लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जाऊ शकत नाही. लोक नंतर अशांना दारात उभंही करीत नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता गडकरींचं हे विधान महत्त्वपूर्ण मानल जात आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून रोगरहित लिंबुवर्गीय रोपटे तयार करणे, या विषयावर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य करणार नसल्याचं म्हटलं. मात्र भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असेल तर आपल्याला आनंदच होईल, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. सरकार कोसळणार की स्थिर राहणार असे प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आपल्या स्पष्टोक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं विधान सूचक मानलं जातं आहे.