बंडखोरांमधील 21 आमदार आमच्या संपर्कात – संजय राऊत
मुंबई : ”हे बंड सत्तेतला वाटा जास्तीत जास्त मिळवा यासाठी करण्यात आलं आहे. महत्वाकांक्षा, लालसा, आमिष ही तीन सूत्र या बंडा मागे आहेत. अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन करताना यामधील कोणीच काही बोलला नाही. त्यावेळी महाराष्ट्रात नवीन प्रयोगाला सुरुवात होत आहे, अशी भूमिका यामधील सर्व लोकांनी घेतली. जर तुम्हाला हा विचार मान्य नव्हता. तर तुम्ही तेव्हाच यात सामील व्हायचं नव्हतं. मात्र तुम्ही स्वतःला हवी असलेली मलाईदार खाते, इतर काही पदे, अधिकार, निर्णय घेतले. अडीच वर्षानंतर तुम्हाला असं वाटत आहे, हिंदुत्वाच्या विचारापासून शिवसेना दूर होत आहे, म्हणून आपण दूर जायला हवं. हे असं सांगणं असं बोलणं हे या राज्यातील जनतेला पटणार नाही, असं संगत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांपैकी 21 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला.
संजय राऊत एबीपी माझा या वरुता वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. राऊत म्हणाले की, ”कोणत्या परिस्थितीत हे सरकार बनले, हे सर्वाना माहित आहे. आम्ही गेले 25 वर्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षांसोबत होतो. 2014 साली हिंदुत्ववादी पक्ष असताना ही भाजपने आमच्याशी युती तोडली. तेव्हा हे सर्व आमच्या सोबत होते. त्यावेळी यामधील एकानेही काही म्हटले नाही. मी सोडून. मीच यासाठी भांडत होतो. निवडणूक तेव्हा झाली आम्ही जिंकलो, पुन्हा युती झाली. तेव्हाही हे लोक सरकारमध्ये गेले. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. मी त्यांच्या विषयी फार टोकाची टीका करेल किंवा काही, असं काही नाही. ते माझे जवळचे मित्र आहे. आमचं भावनिक नाते सुद्धा आहे. इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आठ दिवसापूर्वी आम्ही दोघे एकसोबत अयोध्येत होतो.”
पुढे बोलताना राऊत म्हणाले, ”शिंदे यांचा प्रश्न काय, तर त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. हा हिंदुत्व वगैरे विचार, हे सर्व फोडणी आहे. त्यांना मुख्यमंत्री करण्यापासून रोखलं कोणी, तर भारतीय जनता पक्षाने. भारतीय जनता पक्षाने 2019 मध्ये शब्द पळाला असता, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद किंवा 50-50 पॉवर शेअरिंग, त्यात मुख्यमंत्रीपद सुद्धा होत. त्यावेळी भाजपने शब्द पळाला असता तर उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाने बेईमानी केली म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि आता त्याच भाजपसोबत ते जायला निघाले आहेत.
”सदा सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर फार मोठा आक्रोश मोर्चा काढला. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मलाही बोलावण्यात आलं होतं. पण दुसऱ्या दिवशी ते पळून गेले. छातीत दुखत आहे सांगत रुग्णालयात दाखल व्हायचं आहे म्हणाले आणि घरी गेले. नंतर घरातूनच मागच्या दारातून पळून गेले. एकटे सरवणकर असे आहेत का, तर नाही. दोन दिवसांपूर्वी काही प्रमुख मंत्री वर्षा बंगल्यावर आमच्यासोबत बसून पुढील काही योजनांवर चर्चा करत होते. दुसऱ्या दिवशी यातील गुलाबराव पाटील, दादाजी भुसे हे सर्व वरिष्ठ मंत्री अचानक तिथे (गुवाहाटीला) निघून गेले. गुलाबराव पाटील हे शिवसेनेतील सर्वात जुने नेते. त्यांची भाषणं ऐकली तर ते म्हणायचे, माझ्यासारख्या पानटपरी चालवणाऱ्याला शिवसेनेने कसं मोठं केलं. आमदार केलं, जिल्हा मंत्री बनवलं, राज्य मंत्री बनवलं. कॅबिनेट मंत्री केलं, हे महाशय स्वतःच सांगतात आणि पळून जातात”, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात ते असं म्हणाले आहेत.
संदीपान भुमरे सहावेळा आमदार झाले. त्यांना पहिल्यांदा तिकीट मिळावं म्हणून मी शिवसेना प्रमुखांशी थोडासा वाद केला होता. मोरेश्वर साबळे यांचं तिकीट कापून त्यांना द्यायला लावलं. त्यावेळी हे महाशय पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्यात चौकीदार म्हणून काम करत होते. ते आज कॅबिनेट मंत्री आहे. यांना काय कमी दिलं शिवसेनेने, कुठलं हिंदुत्व सांगत आहेत हे आम्हाला. यांना हिंदुत्व हा शब्द तरी लिहिता येतो का? भुमरे यांनी शब्द लिहून दाखवावा हिंदुत्व आणि बोलून दाखवावा. हे सर्व यांना शिवसैनिकांनी वर्गणी आणि खिशातून पैसेकाढून निवडून आणलं आहे. मात्र हे परत निवडून येणार नाहीत.”