ओबीसी समाजाला मोठा लढा उभारावा लागेल- हरिभाऊ राठोड
पुणे ;; ओबीसी समाजाचं आरक्षण , जातनिहाय जनगणना यासह विविध प्रकारच्या मागण्या ओबीसी समाज वारंवार करीत आहे .परंतु ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही त्यामुळे आता राज्यातील सर्व ओबीसी समाजाच्या जातींनी आणि घटकांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारावा लागेल असे मत ओबीसी समाजाचे नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पुण्यात ओबीसी समाजाच्या महापरिषदेत व्यक्त केले .
पुढे ते म्हणाले की जातीय जनगणना करणे मनावर घेतल्यास एक महिन्यात ही पूर्ण होऊ शकते .आज ओबीसी समाज एकत्र नसल्यामुळे कायम दुर्लक्षित राहिला आहे .त्यामुळे भावी पिढीला उज्ज्वल भविष्य द्यायचे असेल तर आता समाजाने एकत्र येणे काळाची गरज असल्याचे राठोड यांनी सांगितले .
या महापरिषदेचे उद्घाटन माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि संविधानाचे पूजन करून करण्यात आले .
महापरिषदेच्या सुरुवातीला ओबीसी समाजातील देववाले ,मरीआई वाले ,व इतर गोंधळी समाजाच्या वतीने गोंधळ घालून आणि मरीआई देवीची गाणी गाऊन सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी जागर करण्यात आला .
यावेळी ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले की ,ओबीसी समाजाचे भवितव्य खूप अंधारात आहे असे वाटते आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांनी आता याचा विचार केला पाहिजे .आता आपण अनुसूचित जातीतील समाज बांधवांना घेऊन चळवळीत सहभागी झाले पाहिजे आणि त्यांना आपल्या लढ्यात सहभागी करून घेतले पाहिजे .
या वेळी ओबीसी समाजाचे आरक्षण, जातनिहाय जनगणना ,क्रिमिलेरची अट रद्द करावी ,प्रमोशन मध्ये ओबीसी आरक्षण , मुलांना जिल्हा तालुका निहाय वसतिगृह निर्माण करावी ,ओबीसी समाजाची संघटनात्मक बांधणी यासारख्या अनेक प्रश्नांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली तसेच या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचे व पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले .
या महापरिषदेचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते .या महापरिषदेस ज्येष्ठ नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड ,माजी आमदार रामहरी रुपनवर, संजय बालगुडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पी.बी.कुंभार ,बाळासाहेब सानप ,माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया ,राकेश खडके ,प्रदेश उपाध्यक्षा किरण शिंदे ,दीपक महामुनी
नामदेव महादे ,सुधाकर कुंभार
,चेतन चातुरे ,जोतीराम कुंभार, दिपक महामुनी ,सुधीर गवळी यासह राज्यभरातून विविध पक्ष संघटनाचे नेते ,कार्यकर्ते ,महीला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
