अजितदादांना बोलू न देणं ही दडपशाही – सुप्रिया सुळे
पुणे : आज देहू येथील संत तुकाराम शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांचे भाषण झाले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण केले. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण झाले नाही किंबहूना त्यांना बोलण्याची संधीच देण्यात आलेली नाही. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रासारकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं ही दडपशाही असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी इशारा केला होता, पण ..
या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी अजित पवार यांना हाताने इशारा करून बोलण्यास सांगितले. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवार बोलण्यास उठले नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झाले.
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या गोष्टीचा निषेध केला असून ही चूक निदर्शनास आणून दिली आहे.
अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री आहेत, प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी जर शासकीय प्रोटोकॉल पाळला नसेल व काही कारण नसताना देवेंद्र फडणवीस यांना बोलते करून स्वपक्षाचा प्रचार केला असेल हा संविधानिक पदाचा अपमान आहे मोदीजी चूक दुरुस्त करा
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 14, 2022