राजशिष्टाचार हा फक्त महाराष्ट्रानेच पाळायचा का ? केंद्र सरकार आपला राजशिष्टाचार का पाळत नाही ?
रविकांत वरपे यांचा सवाल
पिंपरी : देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेण्यासाठी आणि त्यांचे राज्याच्या वतीने स्वागत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे विमानतळावर हजर होते. राज्याच्या वतीने पंतप्रधानांचे त्यांनी स्वागत केले आणि देहू येथील कार्यक्रमात उपस्थित राहिले. हा राज्याचा राजशिष्टाचार अजित पवार यांनी पाळला. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने त्यांचा राजशिष्टाचार का पाळला नाही ? उपमुख्यमंत्री पवार यांच्या भाषणाला नकार देणे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या अपमानाची परंपरा नरेंद्र मोदी कायम ठेवू पाहत आहेत काय ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंतप्रधान कार्यालयाने नकार देणे हे कोणत्या पंतप्रधान कार्यालयाच्या कोणत्या राजशिष्टाचारात बसते ? पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत नसताना देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र, पंतप्रधान कार्यालयाच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देहू येथील भाषणाला पंतप्रधान कार्यालयाचा नकार हे राजकारण राज्यातील भाजपच्या सांगण्यावरून झाले, असा माझा स्पष्ट आरोप आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने आपली भूमिका जाहीर करावी, असेही रविकांत वरपे यांनी म्हटले आहे.