प्रपंच नव्हे परमार्थ शिकवावा लागतो ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे
पुणे : भगवंत सान्निध्याचा अनुभव सर्वांनी घ्यावा, ही संत सूरदासजींची तळमळ आहे. म्हणून ते मनाला समोर ठेऊन जनाला उपदेश करतात. त्यामध्ये प्रपंच हा शिकवावा लागत नाही. परंतु परमार्थ मात्र शिकवावा लागतो असे त्यांनी सांगितले असल्याचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे यांनी उपस्थितांना कीर्तनातून सांगितले.
श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने तुळशीबाग राम मंदिरात भागवत एकादशीनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.
वासुदेवबुवा बुरसे म्हणाले, भगवंताच्या भजनाची गोडी मनाला आपसूक लागणे फार कठीण, त्यासाठी समर्पणाची तयारी असावी लागते. ते समर्पण अन्य कोणत्याही गोष्टीचे नसून भगवद् भजनाच्या आड येणा-या आपल्या अहंकाराचे आहे, तो अहंकार त्यागल्याशिवाय भजनात गोडी निर्माणच होणार नाही.
ते पुढे म्हणाले, भक्तश्रेष्ठ नामदेवांचे उदाहरण या बाबतीत फारच महत्वपूर्ण आहे. माझा पांडुरंग माझ्याशी बोलतो, माझ्या बरोबर जेवतो. माझ्या कीर्तनात नाचतो, याचाच अभिमान नामदेवांना झाला. पांडुरंगाला तो सहन झाला नाही. त्यातूनच पुढे त्यांना शिकवण देत ब्रहमज्ञानी सत्पुरुषांकडे भगवंताने पाठविल्याचे उदाहरण सर्वांनाच माहित असून त्यातून आपण योग्य पाठ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
