आम आदमी पार्टी च्या ग्रामीण कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
पुणे: आकुर्डी येथे आम आदमी पार्टी च्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यकर्त्यांचा बैठक पार पडली. याला इंदापूर , दौंड, शिरूर , पुरंदर , जुन्नर , बारामती , मावळ इत्यादी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीस अध्यक्ष रंगा राचूरे व निवडणूक प्रभारी, गोव्याचे माजी उद्योगमंत्री महादेव नाईक उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग सधन असूनही येथे शेतकर्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. येथील अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या को ओपेरेटीव संस्था या आतून पोकळ झाल्या आहेत. आणि त्याला कारणीभूत प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत. त्याविरुद्ध आवाज उठवावा लागेल.शेतकर्यांच्या अतिरिक्त ऊस, दूध भाव आदी प्रश्नांना हात घालतच निवडणूक राजकारण करावे असा सल्ला या वेळेस रंगा राचुरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या पुढे आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्न राजकीय पटलावर आणून त्या निराकरण करण्यासाठी निवेदने , आंदोलने असे मार्ग हाताळेल असे त्यांनी सांगितले.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रभारी महादेवराव नाईक यांनी पंजाब आणि दिल्लीच्या धर्तीवर शेतकऱ्यासाठी आणि ग्रामीण भागासाठी विविध पर्यायी उपाययोजना राबवणार असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील सर्व पंचायत समित्या ,जिल्हा परिषद, पालिका निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले.
आम आदमी पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांची संख्या कमी असली तरी इच्छाशक्ती दाखवत ५०००० रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिली असल्याचे सांगितले. दिल्लीत स्वामिनाथन आयोगाच्या सूचनेप्रमाणे अभ्यास समिती तयार करीत हमीभाव देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.
यावेळी आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे , महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अजिंक्य शिंदे आणि ग्रामीण भागातील आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
