महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तात्काळ घ्या, विद्यार्थ्यांचे अलका चौकात आंदोलन
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न थेट वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या विरोधात काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या परीक्षेची मुख्य परीक्षा गेल्या तीन महिन्यांपासून रखडली आहे. प्रश्नांबाबत एमपीएससीने तोडगा काढून हा वाद मिटवून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी आज स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका चौकात आंदोलन केले.
नेमके प्रकरण काय आहे ?
एमपीएससीच्या पद्धतीनुसार दोन उत्तरतालिका अपेक्षित असताना आयोगाने तिसरी उत्तरतालिका प्रसिद्ध केली. यावेळी काही प्रश्न रद्द तर काही प्रश्न थेट वगळण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी झाल्याने यावर आक्षेप घेतले प्रश्न बरोबर असताना ते रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली परंतु निकाल जाहीर केला यामध्ये सुमारे साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरले. परिणामी त्यांनी न्यायालयात धाव घेतली विद्यार्थ्यांनी तिसऱ्या उत्तरतालिका व मुंबई औरंगाबाद नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई MAT ने एमपीएससी च्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पुन्हा 17 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून गेल्या दोन महिन्यांत यावर एकही सुनावणी झाली नाही. पुढील महिन्यापासून न्यायालयाला सुट्ट्या लागणार आहे त्यामुळे बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे.
सरकारने महाधिवक्ता यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करून परीक्षेचा तीढा सोडवावा. आयोगाने जे प्रश्न बरोबर होते ते बरोबर द्यावेत व फेर निकाल लावून परीक्षा लवकरात लवकर घ्यावी ही सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. यासाठी आज पुण्यात अलका चौक मध्ये स्पर्धा परीक्षा संपर्क समिती महाराष्ट्र राज्यच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व स्पर्धा परीक्षा संपर्क समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सनेर यांनी केले. या आंदोलनाला स्पर्धा परीक्षा चे विद्यार्थी,स्पर्धा परीक्षा संपर्क समिती महाराष्ट्र राज्य चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.