किरीट सोमय्या सोमय्या हल्ला प्रकरण :पोलिस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत- देवेंद्र फडणवीस
पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर काल हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.राणा दाम्पत्याच्या अटकेच्या प्रकरणात आता किरीट सोमय्यांच्या एन्ट्रीनंतर वाद अधिकच चिघळला.
किरीट सोमय्या खार पोलिस स्टेशनला पोहोचताच शिवसैनिकांनी गोंधळ केला.पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांच्या कारवर चपला फेकल्याचा आरोप केला आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांचं या हल्ल्याला समर्थन आहे असं दिसतंय किंवा पोलिस इतके नाकाम झाले आहेत की असा हल्ला होणार आहे हे माहित असून ते रोखू शकले नाहीत. पोलिस झेड प्रोटेक्टी असलेल्या किरीट सोमय्यांसोबत अशी हयगय करणं चुकीचं आहे. त्यामुळं पोलिसांवर कारवाई करावी अन्यथा उद्या कुणीही सुरक्षित राहणार नाही. पोलिसांसमोर दगड मारला गेला, त्यानंतर एफआयआर घ्यायलाही भीती वाटते. राज्य कुणाचं आहे, असं झुंडशाहीचं राज्य कधी पाहिलं नाही पण आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. मुंबई पोलिसांच्या इतिहासातील लाजिरवाणा काळ सुरु आहे. पोलिसांवर क्रॉस मिस कंडक्टची कारवाई झाली पाहिजे. समोर हल्ला होत असताना पोलीस बघत राहिले. मी स्वत: वरिष्ठांना भेटून या पोलिसांवर कारवाई करण्याबाबत बोलणार आहे. हे पोलिस राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत.असं फडणवीस म्हणाले.
हनुमान चालिसा म्हणा असं म्हणणाऱ्या राणा दाम्पत्याला त्यांच्या घरात जाऊन अटक केली जाते. हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही म्हटली जाणार तर कुठं पाकिस्तानात म्हटली जाणार का? असा सवाल फडणवीसांनी केला. एका महिला प्रतिनिधीला कस्टडीत ठेवलं जातं. कोणताही दोष त्यांच्याविरुद्ध सिद्ध होत नाही. महाराष्ट्र सरकार एका महिलेला इतकं घाबरलं आहे की लोकं जमा करुन हल्ला करण्याची वेळ आली. असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात गुंतवणुकदार यायला का तयार नाहीत याचं आत्मचिंतन सरकारनं करावं. महाराष्ट्रात येणाऱ्या मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या स्वागताला एक साधे उपसचिव जातात. साधी गाडी पाठवली जाते. एका राष्ट्राच्या पंतप्रधानाचं असं स्वागत होणार असेल तर कोण महाराष्ट्रात गुंतवणूक करेल. यावर आत्मचिंतन सरकारनं करावं.असं फडणवीस म्हणाले.
