महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील चार मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. सायरस पुनावाला आणि एन.चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिंमतराव बावस्कर तसेच डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ. राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आज त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यावर्षी एकूण १२८ पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. १० अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापैकी आज काही पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले आहेत. उर्वरीत पुरस्कार दुस-या टप्प्यात 28 मार्च प्रदान करण्यात येतील.
