पुणे शहराला राहण्यायोग्य बनविण्यासाठी सांस्कृतिक उपक्रमांचे योगदान महत्वपूर्ण – मुरलीधर मोहोळ
पुणे : ” पुणे हे देशातील प्रथम पसंतीचे राहण्यायोग्य शहर मानले जाते. मात्र एखाद्या शहराचा विकास हा केवळ रस्ते, उड्डाणपूल, पाणी यांसारख्या भौतिक सुविधांवर अवलंबून नसतो, तर तेथील सांस्कृतिक संपन्नता देखील तितकीच महत्वाची ठरते. त्या शहराला कलेचे काय महत्व आहे, त्याची सांस्कृतिक गरज काय हे सर्व ओळखून त्यासाठी जोपर्यंत आपण काम करत नाही, तोपर्यंत आपले शहर खऱ्या अर्थाने संपन्न म्हणता येणार नाही. त्यामुळे आपल्या शहराचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे,” असे मत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
तुकाराम बीजेचे औचित्य साधत, बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेचे अजित व समीर बेलवलकर यांच्या पुढाकाराने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे अभंग व गाथा यावर आधारित ‘तुका आकाशा एव्हढा’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे, ऐसी अक्षरे मासिकाचे संपादक पद्मनाभ हिंगे, बेलवलकर सांस्कृतिक मंच’चे समीर व अजित बेलवलकर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना अभिनेते प्रवीण तरडे म्हणाले,”अनेक संतांनी ‘शब्द’ याविषयावर लिहीले आहे. ज्यामध्ये संत जनाबाई म्हणतात,” ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे।। ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत।।” प्रत्येकाने शब्द आणि अक्षर यांना आपल्याला पद्धतीने जोखलं आणि मोठं केलं. ही आपल्या मराठी भाषेची परंपरा आहे.
संत फक्त शब्द, अक्षर, अभंग लिहून थांबले नाही तर अक्षर, काना, मात्रा, वेलांटी उकार कसा असावा हे ही त्यांनी सांगितले. अशा उच्च दर्जाचे संत साहित्य जेव्हा आपल्या पर्यंत पोहचते तेव्हा आपण समृद्ध होतो.”
कार्यक्रमात भरत नाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांच्या शिष्या व कन्या अरुंधती पटवर्धन व त्यांचा सहकारी कल्याणी काणे यांचा सहभाग असलेली ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराज यांच्या रचनांवर आधारित विशेष नृत्यनाटिका सादर करण्यात आली.
कार्यक्रमात सूत्रसंचालन राजेश दामले यांनी कले व समीर बेलवलकर यांनी प्रास्ताविक केले.