पुण्यातील पहिले मोफत फिरते मुळव्याध क्लिनिक रुग्णांच्या दारी…
पुणे: मुळव्याध आजार ऐकण्यासाठी थोडासा विचित्र वाटतो. यामध्ये अनेक लोक भीतीपोटी, लज्जेपोटी, योग्य डॉक्टरांची महिती नसल्याने डॉक्टरांना न भेटता स्वतः औषधोपचार करतात, भोंदूगिरीला बळी पडतात व आपल्या आजाराची तीव्रता वाढून ठेवतात. काही काळानंतर या गोष्टीची जाणीव होते. त्यामुळे मुळव्याध ,भगंदर, फिशर या आजाराची जनजागृती होणे खूप आवश्यक आहे. ज्या लोकांना त्रास आहे त्या लोकांनी बिनधास्तपणे वेळच्या वेळी डॉक्टरांपर्यंत पोहोचवून योग्य उपचार करून आजारातून मुक्ती मिळवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी पुण्यामध्ये प्रथमच फिरते मूळव्याध क्लिनिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे.
मंगल मेडिकल रिसर्च फाउंडेशन व डॉक्टर कामठे पाइल्स क्लिनिक सर्जिकल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या सहकार्याने पहिले फिरते मूळव्याध क्लिनिक सुरू करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पुणे परिसरामध्ये मोफत मूळव्याध तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ कर्नल संभाजी पाटील, रा.स्व. संघाचे महेश करपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका वृषाली कामठे, गंगाधर बधे, नगरसेवक वीरसेन जगताप, राकेश कामठे, संदिप बधे, अमित जगताप, महेंद्र लोणकर, मुकुंद दरेकर, प्रमोद दरेकर, पोपट कामठे, शाम मरळ, शिरीष मोहिते , सागर पवार, दत्ता पोकळे, श्रीकांत पवार, कैलास कामठे, डॉ. मुरुड , विकास बधे, योगेश कामठे, विश्वजित कामठे आदि मान्यवर उपस्थित होते. तज्ञ डॉक्टर्स व नर्स या सेवेत सहभागी होणार आहेत.
मुळव्याध आजार अतिशय दुर्धर समजला जातो. या आजाराविषयी आजही लोकांमध्ये न्यूनगंड बाळगला जातो. आजार झाला असताना तो कोणाशीही चर्चा न करता अयोग्य उपचारांनी किंवा चुकीच्या सल्ल्याने उपचार करून बरा करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु अज्ञान असल्यामुळे आजार वाढत जातो. त्यामुळे मुळव्याधा विषयी जनजागृती आवश्यक आहे फिरत्या मोफत मूळव्याध क्लिनिकमुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल, असे मत कर्नल संभाजी पाटील यांनी व्यक्त केले.
महेश करपे म्हणाले, फिरते मूळव्याध क्लिनिक हा अतिशय समाज उपयोगी उपक्रम असून, यामुळे समाजामधील मुळव्याधा विषयी होणारे गैरसमज व या विषयाची जनजागृती सुलभ रीतीने होण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे लोकांना आहार-विहार काय करावा व काय केल्यामुळे आपले आरोग्य चांगले टिकून राहील याकडे लक्ष देता येईल. असे उपक्रम जर संपूर्ण भारतभर राबविले गेले तर िश्चितपणे मूळव्याध मुक्त भारत होण्यासाठी वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
डॉ.कुणाल कामठे म्हणाले, ज्या लोकांना मुळव्याधाचा त्रास आहे त्यांच्यावर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. तसेच जीवनशैलीत योग्य तो बदल करून पथ्य पाळणे हेही तितकेच गरजेचे आहे. आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ,काय टाळावे हे लोकांपर्यंत पोहोचावे आणि आजारापासून दूर राहावे होऊ नये म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. डॉ. शर्मिला कामठे यांनी सूत्रसंचालन केले.
