दुभाजक व वीजेचे खांब न हटविल्यास धायरीकर तीव्र आंदोलन करतील – श्रीरंग चव्हाण पाटील
पुणे : धायरी येथील अरुंद रस्त्यावर असलेले धोकादायक लोखंडी रस्ता दुभाजक व वीजेच्या खांबामुळे अपघात होऊन निष्पाप नागरिक जायबंदी होत आहेत. धोकादायक दुभाजक व खांब तातडीने न हटविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धायरीकरांनी दिला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव श्रीरंग चव्हाण पाटील यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
मुख्य सिंहगडरोड पासून धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती चौका पर्यंत महापालिकेने रस्त्याला लोखंडी दुभाजक बसविले आहेत. अगोदरच रस्ता अरूंद आहे. परिसरात लोकवस्त्या वाढल्याने प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अरुंद रस्त्यावर लोखंडी दुभाजकामुळे वाहतूक सुरळीत होण्या ऐवजी वाहनांच्या दोन्ही बाजुला रागां लागत आहे. उलट वाहतूक कोंडीत भर पडली आहे. दुभाजकांला धडकुन वारंवार अपघात वाढले आहेत. रात्री दुभाजक दिसत नसल्याने वाहने धडकुन झालेल्या अपघातांत अनेकजण जखमी झाले आहेत. तर काहीनां कायमचे अपंगत्व आले आहे. काही ठिकाणीचे दुभाजक गायब झाले आहेत.
तसेच धायरी गावातील उंबऱ्या चौक ते डीएसके विश्व रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरु आहे. मात्र महापालिकेने रस्त्यावरील धोकादायक वीजेचे विद्युत खांब हटवले नाहीत. वाहतूक कोंडी वाढली आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारे विद्युत खांब बाजूला घ्यावे व दुभाजक त्वरित हटविण्यात यावेत, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
