तुम्हाला विश्वासात घेतले म्हणजे ओमीक्रोन कमी होणार अन् नाही घेतले तर होणार नाही – जितेंद्र आव्हाड
पुणे : आजार काही सत्ताधारी पक्षात जाणार आणि विरोधी पक्षात जाणार नाही असं नाही. तुम्हाला विश्वासात घेतले म्हणजे ओमीक्रोन कमी होणार अन् नाही विश्वासात घेतले तर ओमीक्रोन कमी होणार नाही, असेही नाही, अशी टीका गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षांवर केली आहे.
वाढत्या कोरोना रुग्ण संख्या वाढीमुळे राज्य सरकारने परत निर्बंध लावले आहेत. त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून आम्हाला विचारात न घेता सरकारने निर्बंध लावले आहेत, अशी टीका विरोधी पक्षांनी महा विकास आघाडी सरकारवर केली आहे. याला आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
सध्या घाणेरडे राजकारण सुरू आहे
मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपच्या आयटी सेलच्या जितेंन गजरीया यांनी एक आक्षेपहार्य आणि राजकीयदृष्ट्या केवळ चिखलफेक करणारे ट्विट केलं होतं. त्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. त्यावर आव्हाड म्हणाले,सध्याच्या पातळीवर राजकारण खूप खालच्या पातळीवर गेले आहे, गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यात जो मनाचा मोठेपणा पहिला तो आता राहिला नाही. मी एवढे मोर्चे पाहिले पण माझ्या घरावर मोर्चा काढला जातो, घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या खूप घाणेरडे राजकारण सुरू आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मी वक्तव्य बदलणारा माणूस नाहीय
ओबीसी आरक्षणाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी मध्ये एक विधान केले होते. त्यावर आव्हाड म्हणाले,मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम आहे, मी माझं वक्तव्य बदलणारा माणूस नाहीय, मी जे बोलतो ते माझ्या हदयापासून असते, पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाहीय.