सावित्रीची वाणी ध्यानी आणा – डॉ. श्रद्धा कुंभोजकर
पुणे : सावित्रीबाई या केवळ चांगल्या महिला शिक्षिका नव्हत्या तर त्या एक जागरूक नागरिक, उत्तम पत्नी व व्यक्ती म्हणून समृद्ध होत्या, त्यांची वाणी आजच्या निमित्ताने पुन्हा ध्यानी आणत त्यांच्या विचारांनी चालण्याची गरज आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या ‘सावित्रीची वाणी ध्यानी आणा’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. अंजली कुरणे, इनोव्हेशन सेलच्या प्रमुख डॉ. अपूर्वा पालकर, महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. कुंभोजकर म्हणाल्या, सावित्रीबाईंच्या वाणीचं सूत्र हेच होते की त्या, कोणतीही गोष्ट स्वतःच्या विचाराने, विवेकाने ठरवत. कोणताही विचार हा स्वीकारण्याआधी किंवा नाकारण्याआधी मानवकेंद्री विचारातून त्याची चिकित्सा करत. त्यावेळी सावित्रीबाईंवर ‘पाश्चात्य संस्कृतीच्या पुरस्कर्त्या’ असा आरोप झाला. मात्र त्यांनी अविवेकीपणे कधीही पाश्चात्य संस्कृतीचा पुरस्कार केला नाही. याचं टीकात्मक परिक्षणही त्यांनी केलं. फक्त महिला म्हणून नाही व्यक्ती म्हणून त्यांनी समाजासाठी मोठं योगदान दिले आहे.
यावेळी पाली भाषा विभागातील संशोधक विद्यार्थी मिलिंद वाघमारे या विद्यार्थ्याने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. तसेच यावेळी मोगल जाधव यांनी लिहिलेल्या ‘सावित्रीबाई जोतीराव फुले कार्य आणि कर्तृत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षणामुळेच माणूस नावाचा प्राणी माणुसपणाकडे वळला
“जीवन मुल्य, सौंदर्यशास्त्र आणि शिक्षण या तीन गोष्टीतून फुले दाम्पत्याने मूल्यव्यवस्था बळकट करण्याचे काम केले. शिक्षणामुळेच माणूस नावाचा प्राणी माणुसपणाकडे वळला. त्यांच्या या कार्याने आपल्याला केवळ प्रेरणा दिली नाही तर सतत जागं ठेवण्याचं काम केलं आहे.”
– डॉ. एन.एस.उमराणी (प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)