नववर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीने; राज्यात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता
पुणे : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थंडी काहीशी कमी झाली होती. मात्र, पावसाने उसंत घेताच कालपासून थंडीचा कडाका वाढायला सुरूवात झाली असून आता नववर्षाचे स्वागत हे कडाक्याच्या थंडीतच करावे लागणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्यात तापमानाचा पारा आणखी घसरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट झाली आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे राज्यातून थंडी गायब झाली होती. पण आता बोचणारी थंडी जाणवू लागली आहे. सध्या उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. येत्या 2 दिवसांत वायव्य भारतात देखील तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र देखील येत्या काही दिवसांत गारठा वाढण्याची शक्यता असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत 2 ते 4 अंश सेल्सिअस किमान तापमानात घट होऊ शकते. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीने होण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार पावसाची तर वायव्य भारताच्या मैदानी प्रदेशात जोरदार पावसासह हिमवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून महाराष्ट्र देखील गारठा वाढणार आहे.
