Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे’ हा विचार समाजात रुजावा – अविनाश महातेकर

पुणे : “समाजातील कित्येक समस्या सोडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य लोकांची ताकद बनले. आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचा प्रेरणादायी विचार त्यांनी समाजाला दिला. त्यामुळे डॉ. आंबेडकर एका विशिष्ट जातीपुर्ते मर्यादित न राहता, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे’ आहेत, हा विचार समाजात रुजवण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे,” असे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी व्यक्त केले.
संंविधान सन्मान समिती, आंबेडकरी पक्ष-संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भुमिपुजन तसेच प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात पुढाकार घेऊन त्याची पुर्तता करणारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार होते. यावेळी ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे,  बाळासाहेब जानराव, सभागृह नेते गणेश बीडकर,   डॉ. विजय खरे, नगरसेविका फरझाना शेख,  राहुल डंबाळे, ऍड. मंदार जोशी, संगीता आठवले, शशिकला वाघमारे आदी उपस्थित होते.

अविनाश महातेकर म्हणाले, “अस्पृश्यतेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढत समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिल्यानंतर ही त्यांचे नेतृत्व स्विकारण्यास विलंब झाला. अनेक अरिष्ठ परंपरा विरोधात बाबासाहेब अविरत लढले. समाजातील सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याची त्यांची प्रमाणिक भुमिका होती. जागतिक पातळीवर सर्वात जास्त आंबेडकर यांची स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र आता पुढच्या पिढीमध्ये त्यांचे विचार पेरणे ही तितकेच गरजेचे आहे.”

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही आपल्या सर्वांचे आदरस्थान आहे. पुणेकरांच्या वतीने त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी पालिकेच्या आवारात भव्य पुतळा बसविण्यासाठी ठराव मांडला गेला. त्याला सर्वच पक्षाच्या नेत्यांनी संमती दर्शवली. वाडेकर यांचा पुढाकार हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महत्वाचा ठरला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले आणि डॉ. आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे असणारी ही एकमेव पालिका असणार आहे.”

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंबेडकरांचा पुतळा उभारणे हा ऐतिहासिक क्षण आहे. समाजात आंबेडकरी पुतळ्यांना विरोध का होतो, हेच कळत नाही. सिम्बायोसिसजवळ उभारलेल्या आंबेडकर स्मारकावेळी आम्हालाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. आंबेडकर फक्त महामानव न राहता ते विश्वमानव कसे होतील, याचा विचार आपण केला पाहिजे. समाजातील अज्ञान, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे.”

राहुल डंबाळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन दिपक मस्के यांनी केले. आभार शैलेंद्र चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading