Friday, May 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी उत्तमतेवर भर द्या – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात उत्तम काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा: परिचय आणि संवर्धन’ या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, महापौर उषा ढोरे, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त राजेश पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, डेक्कन महाविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. वसंत शिंदे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशासाठी ज्यांनी बलिदान देत जीवन समर्पित केले त्यांचे नाव मृत्यूनंतरही अजरामर आहे. अशा महान व्यक्तिमत्वांचा आदर्श समोर ठेवीत देशाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने उत्तमतेवर भर दिल्यास देशाची अधिक प्रगती होऊ शकेल.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी केले जाणारे प्रयत्न स्तुत्य आहेत. गुरुकुलमच्या माध्यमातून पारंपरिक कलेचा विकास होत आहे. यामुळे उपेक्षित, मागासलेल्या समाजातील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबत त्यांच्या कलेला वाव देत आर्थिक विकास होण्यासही मदत होत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल महोदयांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्ह आणि वारसास्थळाच्या जतनासंदर्भातील
संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
0000

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading