4 वर्ष प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अभाविप काढणार आक्रोश मोर्चा
पुणे : महाराष्ट्र शासनाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. राज्य शासनाकडून एस सी. , एस बी सी ,ओबीसी, एनटी. इ. बी. सी. , व्ही. जेएनटी आशा अनेक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्गानुसार शैक्षणिक शुल्कात अनुदान म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात झाल्यामुळे त्यांना अल्पदरात शिक्षण घेता येते. ही शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून गेली चार वर्षे विद्यार्थ्यांना दिली गेलेली नाही. यामुळे सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता आला नाही.
महाराष्ट्र राज्यातील एकूण ५ लाख ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. या सर्व शिष्यवृत्तीचे एकूण ६ हजार कोटी रुपये राज्य शासनाने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर द्यावेत. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगराकडून विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले गेले आहे. याशिवाय शिष्यवृत्तीत असलेल्या इतर समस्यांच्या निवारणाची मागणी अभाविपकडून केली जात आहे. या सर्व मागण्यांना घेऊन अभाविप पुणे शाखा २१ डिसेंबर मंगळवार या दिवशी सकाळी ११ वाजता निद्रिस्त महाराष्ट्र सरकारला विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बाबत जागृत करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. तर समाज कल्याण कार्यालय येथे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता होईल.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे पैसे परत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शक्तीच्या हुंकाराचे प्रतीक म्हणून हा मोर्चा निद्रीस्त सरकार व समाज कल्याण विभागाला खडबडून जागे करण्यासाठी आयोजित केला आहे. असे मत पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी यावेळी मांडले.